महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे
मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर
लोकल ट्रेन सेवा कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल, आजही सेवा उशिराने
हवामान खात्याचा पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड जोर धरला असून मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला अक्षरशः झोडपून काढले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून अनेक ठिकाणी वाहनांची लांबलचक रांग लागलेली दिसली. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. याचाच फटका मुंबईच्या लोकलला देखील बसला आहे. आजही मुंबई लोकल उशिराने धावत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे.
मुंबईसारख्या महानगरात पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला दिसतो. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन सेवा काल दुपारी पूर्णपणे कोलमडली होती. दुपारी बाराच्या सुमारास मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. जवळपास आठ तास सेवा विस्कळीत राहिल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. संध्याकाळीच सेवा काही प्रमाणात सुरळीत करण्यात आली, मात्र यामुळे कामावर गेलेल्या अनेकांना घरी परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
आज मध्य रेल्वेवर गाड्या २० मिनिटे उशिराने धावत आहेत, तर पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आजही लोकल सेवा पुन्हा ठप्प होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे आवश्यक काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतच नव्हे तर उपनगरांमध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येही पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी आणि नवी मुंबई परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक इमारतीच्या तळमजल्यांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून, एनडीआरएफच्या पथकांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. अनेक शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागातही पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. एकीकडे पावसामुळे शहरी जीवन विस्कळीत झाले असले तरी ग्रामीण भागातील अनेकांना या पावसामुळे पाण्याच्या तुटवड्यापासून दिलासा मिळेल, अशी आशा आहे. मात्र मुसळधार पावसाने आणखी काही दिवस जोर धरला तर पूरस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.