
गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे अेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २ जण अद्यापही बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमध्ये गोव्यावरून मुंबईमध्ये पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह सापडला पण तिच्या मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवावरून सोनाली गावंढळ ही महिला पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी मुंबईला आली होती. तिच्यासोबत तिची मोठी बहीण, तिचा नवरा आणि त्यांची २ लहान मुलं मुंबईमध्ये आली होती. २ दिवस मुंबई फिरता येईल म्हणून हे सर्वजण सोनालीसोबत आले होते.
मुंबईत आल्यावर बोटीने एलिफंटा जाण्याचा त्यांचा प्लॅन झाला. मात्र बोट दुर्घटनेमुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. सोनालीची बहीण सकीना पठाण आणि तिचा ६ वर्षीय मुलाचा या बोट दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. सकीनाचा मृतदेह उरण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय. पण तिचा चिमुकला अद्यापही बेपत्ता आहे.
'दुर्घटना घडली त्यावेळी लाईफ जॅकेट घातले नव्हते. स्पीड बोट धडकल्यानंतर बोटीत पाणी शिरू लागल्यावर लाईफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले. बोटीत फक्त ५० लाईफ जॅकेट होते. त्यामुळे अनेकांना लाईफ जॅकेट मिळाले नाहीत.' असा गंभीर आरोप सोनालीने केला आहे. 'आम्ही बोटीच्या वरच्या बाजूला होतो तर बहीण खाली होती. तिला लाईफ जॅकेट मिळाले नाही. बोट बुडू लागली तसे खाली असलेले लोकं पाण्यात बुडाले त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही. सकीनाचा मृतदेह तरी सापडला. मात्र तिच्या ६ वर्षांच्या मुलाचा शोध सुरू आहे. ', असे सोनाली यांनी सांगितले.
'सोनाली स्वतः बोटीला धरून राहिल्याने वाचल्या तर बहिणीच्या नवऱ्याने एका हाताने बोट पकडली तर दुसऱ्या हाताने १० महिन्यांच्या बाळाला पकडले. बाळाच्या तोंडात पाणी जाऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यांनी स्वत:चा जीव मुठीमध्ये धरून त्याचा जीव वाचवला. कुठून दुर्बद्धी सुचली आणि आम्ही फिरायला इथे आलो.' अशी खंत सोनालीने व्यक्त केली.
दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने बुधवारी धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामधील ९० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर उरणच्या जेएनपीटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.