

मुंबई, ठाण्यात उन्हाचा कडाका वाढलाय
मुंबई, ठाण्यात सलग दोन दिवस बंद राहणार पाणीपुरवठा
नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन
राज्यासह मुंबई, ठाण्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. नोकरी-कामानिमित्त घराबाहेर निघालेल्या लोक उन्हामुळे घामाघूम होत आहे. कडक उन्हामुळे शहर तापलं असताना मुंबई, ठाण्यातील नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई, ठाण्यात सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यातील नागरिकांना जपून पाणी वापरावे लागणार आहे.
मुंबईतील जलवाहिन्यांची व्यवस्था आणखी सक्षम करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने शिवडी परिसरात महत्वाचे तांत्रिक काम हाती घेतलं आहे. पालिकेने हाती घेतलेल्या कामामुळे २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवारी २३ एप्रिल रोजी पहाटे ४ पर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा तब्बल १८ तास पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे. मुंबईतील पाच महत्वाच्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही.
शिवडीच्या हाजी बंदर मार्गावर १५०० मिमी व्यासाचे दोन 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. या दुरुस्ती कामासाठी जलविभाजक बंद ठेवाली जाणार आहे. ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या ५ विभागांतील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. पालिकेने ऐन उन्हाळ्यात हाती घेतलेल्या कामामुळे हौसिंग सोसायट्या आणि झोपडपट्टी परिसरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. काही भागात पाणी पूर्णपणे बंद असेल. कर काही भागात अत्यंत कमी दाबाने पुरवठा होणार आहे. तसेच या भागातील रुग्णालय परिसराला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आलेत.
ठाण्यातही पाणीबाणी
ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे प्रभाग समिती या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे गुरूवार 23/04/2026 रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 24/04/2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.