Carnac Bridge Renamed as sindoor Bridge Mumbai : दक्षिण मुंबईतील १५० वर्षे जुन्या कर्नाक पूलाचे नामकरण सिंदूर उड्डाणपूल असे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी हा ब्रिज महत्त्वाचा मनला जातोय.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाक पूलाचे उद्घाटन केले, त्यासोबतच मुंबकरांसाठी या पुलाला नवीन नाव दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्नाक पूल आता सिंदूर पूल म्हणून ओळखला जाईल. हा पूल १५० वर्षांपासून कर्नाक पूल म्हणून ओळखला जात होता. आता त्याचे नाव सिंदूर पूल असेल. फडणवीस म्हणाले की, कर्नाक पूलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्याचा उद्देश म्हणजे कर्नाकच्या काळ्या इतिहासाचे डाग पुसणे आहे. कर्नाक हा एक ब्रिटिश गव्हर्नर होता, त्याने भारतीयांना फसवले आणि त्यांच्यावर अत्याचार केले होते. त्यामुळे या पूलाचे नाव बदलण्यात आले.
भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी (South Mumbai East-West road connectivity bridge) अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा सिंदूर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झाले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीची कार्यवाही आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने यशस्वीपणे पूल उभारणी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण मुंबईत, मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला सिंदूर उड्डाण पूल जोडतो. सिंदूर पूल एकूण ३४२ मीटर लांबीचा आहे. त्यापैकी ७० मीटरचा भाग रेल्वे मार्गाच्या संरचनेवर उभारण्यात आला आहे. संपूर्ण पूल अत्यंत दर्जेदार, सुरक्षित आणि वाहतुकीस अनुकूल अशा पद्धतीने उभारण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास निश्चितच मदत होईल.
मुंबईच्या दक्षिण भागातील पी. डि'मेलो रस्त्यावरील बंदर परिसर आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांना रेल्वे मार्गावरून पूर्व-पश्चिम जोडणारा सिंदूर पूल हा एक महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे अनेक वर्षांपासून अडथळा येणारी पूर्व-पश्चिम दिशेतील वाहतूक आता सुकर होईल. सिंदूर पूल पुन्हा कार्यान्वित झाल्याने पी. डि'मेलो मार्ग आणि पुढे शहीद भगतसिंग मार्ग, विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग यांच्या जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या पुनर्बांधणीमुळे युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होईल.
सिंदूर पूल हा मुंबईतील एक महत्त्वाचा पूल आहे. पूर्व-पश्चिम वाहतुकीला जोडणारा प्रमुख दुवा आहे. या पुलाची रचना आणि आकारमान यामुळे तो शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. संपूर्ण प्रकल्पाची लांबी ३४२ मीटर आहे, ज्यामध्ये पूल आणि त्याला जोडणारे रस्ते यांचा समावेश आहे.
संपूर्ण पूलाची (प्रकल्पाची) लांबी – ३४२ मीटर
लोहमार्गावरील पूल: आर.सी.सी. आधारस्तंभांवर (पीअर) प्रत्येकी ५०७ मेट्रिक टन वजनाचे, ७० मीटर लांब व २६.५० मीटर रुंद व १०.८ मीटर उंच असे दोन गर्डर, आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्ते : लांबी – २३० मीटर (पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस - १०० मीटर), आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.