Pune : “खाऊन-पिऊन आंदोलन करा" नरहरी झिरवळांचा उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Pune News : पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे १४ दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. १४ मागण्यांवर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार.
narhari zirwal controversial advice tribal students
narhari zirwal controversial advice tribal studentsAI Image
Published On
Summary
  • पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे १४ दिवस आंदोलन

  • विद्यार्थ्यांची सरकारसमोर विविध मागण्यांसाठी ठोस आणि लेखी आश्वासनाची मागणी

  • झिरवळांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांची नाराजी

  • “खाऊन-पिऊन आंदोलन करा” झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र, विद्यार्थ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या १४ प्रमुख मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंत्री अशोक उईके यांनी १५ विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास बैठक घेतली. या बैठकीनंतर चर्चा सकारात्मक झाल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले. मात्र, काही मागण्यांबाबत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यासाठी त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. मात्र, विद्यार्थ्यांची भूमिका ठाम आहे. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. सलग १४ दिवस उपोषण सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहितीही समोर आली आहे.

narhari zirwal controversial advice tribal students
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

दरम्यान, चर्चा झाल्यानंतर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना, “खाऊन-पिऊन आंदोलन करा,” असा सल्ला दिल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. झिरवळ हे सांगत असताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. “खाऊन-पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही इथे आलेच नसते,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. या संवादामुळे आंदोलनस्थळी काही काळ वातावरण हलकेफुलके झाले असले, तरी विद्यार्थ्यांमध्ये झिरवळ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे. “झिरवळांना मजाक करण्याची सवय आहे,” अशी प्रतिक्रिया काही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांच्या गंभीर आंदोलनाची थट्टा केली जात असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू झाली.

दरम्यान, मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, तांत्रिक बाबींवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com