
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सरकारसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या पुष्पा स्टाईलने दाडीवर हात फिरवण्यावरून उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केलं तर उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'खरं म्हणजे तीन वर्षांपूर्वी धो डाला. उठेगा नही साला हा डायलॉग त्यांनाच शोभून दिसतो. 3 वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला आणि अन्यायाविरुद्ध उठलो. तेव्हा दाढीवरून अर्धाच हात फिरवला ते ३ वर्षापूर्वी आडवे झाले. अजूनही ते सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उठेगा नही हे असे बोलणं त्यांना शोभत नाही. त्यासाठी मनगटात जोर लागतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडून काही होत नाही.'
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील फरकाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी ऐवढेच सांगेन एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोकं म्हणत होते. एकाने मात्र एका वक्त्याने पथ्य पाळलं आणि दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला.'
मराठी भाषा विजय दिवस कार्यक्रमावर टीका करताना पुढे शिंदे म्हणाले की, 'मराठीबाबत बोलायचे झाले तर त्यांनी राज्यगीत म्हटलं. पण त्या राज्यगीताला मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली. त्या राज्यगीताने त्यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला. ज्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या मोदींनाही तुम्ही सोडले नाही. त्यांच्या भाषणात द्वेष, जळजळ आणि मळमळ होती हे दिसून आले. त्यांनी मराठीसाठी काय केले? मराठी माणून मुंबईबाहेर का फेकला गेला? याचे उत्तर त्यांनी द्यावे.'
तसंच, 'त्यांच्याकडून नेहमी माझ्यावर टीका चालूच असते. मी कामातून उत्तर दिले त्यामुळे जनतेला मला पुन्हा संधी दिली आणि मी मुख्यमंत्री झालो. ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या मोदीसाहेबांनाही त्यांनी सोडले नाही. त्यांची सत्तेसाठीची लाचारी आणि लालसा दिसून आली. मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते त्यांना कळाले असते. फायर की फ्लॉवर हे पुढच्या निवडणुकीत कळेल. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबत युती-आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुकी जशाजशा जवळ येतील तसे अनेक बदल दिसतील.', असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, 'राज ठाकरेंनी जे बोलले ते पाळले. उद्धव ठाकरेंनी तळमळ बोलून दाखवली. पण उद्धव ठाकरेंच्या पोटात जे आहे ते ओठावर आले. मराठी माणसाला जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला. मला वाटले होते ते आधी येऊन माफी मागतील. कारण हिंदी अनिर्वाय करण्याचे काम त्यांच्या काळात झाले होते. आम्ही अनिर्वाय हा शब्द काढून टाकला. बाळासाहेबांचे विचार २०१९ ला त्यांनी सोडले. त्यामुळे जनतेने त्यांना धोपटले. त्यांनी १०० निवडून आणले आणि २० चं झाले. खुर्चासाठी त्यांनी माहराष्ट्रातील जनतेसोबत विश्वासघात केला. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.