Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाती निधनाला महिना पूर्ण; 30 दिवसात बदललं राज्याचं राजकारण
अजित पवारांच्या अपघाती निधनाला ३० दिवस पूर्ण.
बारामती विमान अपघातानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती.
एका महिन्यात सत्तासमीकरणात आणि पक्ष रणनीतीत बदल.
बरोबर, गेल्या ३० दिवसांपुर्वी महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला, पहाटे अजित पवारांचं विमान बारामतीत कोसळलं आणि वेळ पाळणारे अजित दादा वेळेआधीच महाराष्ट्राला पोरकं करुन गेले. अजित दादांच्या अपघाती मृत्यूची बातमी येताच अवघा महाराष्ट्र हादरला. आजवर विमान अपघातात देशानं अनेक उमदे नेते गमावले पण अजितदादा सारखा कामाचा माणूस अशा पद्धतीनं गेल्यानंतर या अपघातावर संशय व्यक्त झाला.
दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जींनी हा घातपात असल्याचा आरोप करुन या अपघातावर सवाल उपस्थित केला. मात्र जनक्षोभ उसळू नये म्हणून पवारांनी तातडीनं माध्यमांसमोर येत घातपाताचा दावा फेटाळून लावला. दुसरीकडे दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीची विलिनीकरणाची चर्चा रंगली.
मात्र दाव्या प्रतिदाव्यांमुळे ही चर्चाही बारगळली. याच दरम्यान दादांच्या अंत्यसंस्कारानंतर आधी अमोल मिटकरी आणि अजितदादांच्या दहाव्यानंतर रोहित पवारांनी दादांचा अपघात नाही घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. आणि महिनाभरात हा संशय आणखीच बळावत गेलाय.
एका बाजूला मिटकरी आणि रोहित पवारांच्या दाव्यामुळे संशयाचं धुकं गडद होत असतानाच अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार आणि सुनेत्रा पवार यांनी देखिल या अपघाताच्या चौकशी मागणी केली. तर. अजित पवारांच्या निधनाच्या निधनांतर राष्ट्रवादीसोबत राज्यातील राजकीय घडामोडी वेगानं घडल्या. त्या नेमक्या कशा? पाहूयात.
तिसऱ्या दिवशी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत राज्यातील राजकारणात थेट प्रवेश केला. यानंतर अर्थ खातं सोडून अजित पवारांकडील सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवारांवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली. ज्याझेडपी निवडणुकीच्या प्रचारासाठी जातांना दादांचा अपघात झाला त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं.
तर अजित दादांच्या निधनांनंतर सुरु झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणांची चर्चा पुन्हा बासनात गुंडाळली गेली. तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं बसवण्यात आलं तर अजित पवारांचे जेष्ठ सुपुत्र पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली.
याच दरम्यान डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आता एक प्रकारे डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला जबाबदार धरल्यानंतरही पोलीस मात्र कंपनीवर गुन्हा दाखल करत नाहीत.. त्यामुळे संशय आणखीच वाढत चाललाय. आता दादांच्या मृत्यूला महिना पूर्ण झाल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालानंतर ही अनेक सवाल अजूनही अनुत्तरित्तच आहेत. दादांच्या मृत्यूनं राज्याचं आणि राष्ट्रवादीचं राजकारण 180 अंशांनी बदललंय. इतकं मात्र खरंय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

