महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
सोलापूर, जालना आणि बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
१९ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात
महाराष्ट्रात पुन्हा उकाडा वाढण्याची शक्यता
राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, आज अनेक भागांत पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हाचा चटका सोसावा लागला. मात्र आता पावसाने पुन्हा जोर धरला असून येत्या शनिवार पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा उकाडा वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज अनेक भागांत पावसाची उघडीप असेल. मात्र, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच मराठवाड्यातील जालना आणि बीड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या उर्वरित भागात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.तसेच पुढील काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे.
दरम्यान, यंदाच्या मॉन्सूनच्या वाटचालीला सुरुवातीपासूनच काहीसा उशीर झाला. ४ जून रोजी केरळसह कर्नाटकच्या काही भागांत मॉन्सूनचे आगमन झाले, तर ६ जून रोजी त्याने तळ कोकणात प्रवेश केला. त्यानंतर मात्र मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी अडखळत झाली. अखेर २९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनच्या प्रभावाखाली आला. देशभरातील मॉन्सूनची वाटचालही काही काळ मंदावली होती. त्यामुळे यंदा ९ जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. आता मॉन्सूनच्या परतीचे संकेत मिळू लागले आहेत.
मॉन्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर मानली जाते. मात्र, यंदा या वेळेपेक्षा सुमारे दोन दिवस उशिराने, म्हणजेच शनिवार,१९ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त करण्यात आली होती. हवामान विभागाने यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. १४ सप्टेंबरपर्यंतच्या पावसाची आकडेवारी पाहता, देशात आतापर्यंत सुमारे ६७३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत १५ टक्के पावसाची तूट असल्याचे दिसून येते. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असताना देशातील पर्जन्यमानाची स्थितीही लक्षवेधी ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.