
राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने मराठी भाषा विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. या मराठी विजय सोहळ्यामध्ये भाषण करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. 'आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको. महाराष्ट्राला आणि मुंबईला हात लावूनच दाखवा.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी थेट मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारला इशारा दिला.
राज ठाकरे यांनी सांगितले की, 'खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिले असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं पण पाऊस असल्यामुळे जागा मिळत नाही. मी माझ्या मुलाखतीत सांगितले होते की कोणत्याही वादापेक्षा कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत.'
जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. 'मोर्चाला मी हिच घोषणा होती की कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही. खरं तर हा प्रश्न यायला नव्हता पाहिजे होता. पण कुठून हिंदीचा विषय आला माहिती नाही. पण कशासाठी हिंदी, कुणासाठी हिंदी लहान मुलांवर जबरदस्ती करत आहेत. कुणाला विचारायचे नाही शिक्षण तज्ज्ञांना विचारायचे नाही. पण आमच्याकडे सत्ता आहे बहुमत आहे आम्ही लादणार असे त्यांना वाटते. तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते हा त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले. कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का?. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका. मग वेगळीकडे वळवा प्रकरण. मग काय ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडिअममध्ये शिकले. दादा भुसे मराठी शाळेत शिकून शिक्षणमंत्री झाले. देंवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. अरे कुणाकुणाली मुलं परदेशात शिकतात याची यादी आहे आमच्याकडे. मंत्रिमंडळातील मंत्र्याची हिंदी ऐकाल तर फेफरे येईल.'
हिंदी भाषा सक्तीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला काही पत्र पाठवले होते. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, 'एक पत्र लिहिले, दोन पत्र लिहिले नंतर ते दादा भुसे आमच्याकडे आले. ते म्हणाले आम्ही बोलतो ते समजून घ्या. पण मी त्यांना सांगितले मी ऐकून घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आणले. ते सूत्र आले ते केंद्राकडून. केंद्र सरकार आणि राज्य सरकरामधील दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आणले होते. केंद्रीय शिक्षण धोरणातही असं काही नाही. इतर राज्यातही असं काही नाही. त्यांनी महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणकडची राज्यांत बघा. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळाले. त्याशिवाय त्यांनी माघार नाही घेतली.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.