Marathi vs Non Marathi : महाराष्ट्रातच मराठी माणसांची गळचेपी; राजकीय नेत्यांकडून संताप, परप्रांतीयांच्या मुजोरीला जबाबदार कोण? कोण काय म्हणालं?

Marathi people : महाराष्ट्रातच मराठी माणसांची गळचेपी वाढू लागली आहे. या वाढत्या घटनांमुळे राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परप्रांतीयांच्या मुजोरीला जबाबदार कोण? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
maharashtra politcs
Marathi vs Non Marathisaam tv
Published On

Mumbai News : मुंबई आणि जवळील शहरात गेल्या काही दिवसांत परप्रांतीयांची मुजोरी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतही परप्रातीयांकडून मराठी भाषिक नागरिकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील परप्रातीयांच्या वाढत्या मुजोरीविरोधात टीकेचा सूर उमटू लागला आहे. महायुती सरकारच्या काळात परप्रांतीयांची मुजोरी डोईजड व्हायला लागली आहे, अशा शब्दात विरोधकांकडून टीका केली आहे. या वाढत्या प्रकारावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

maharashtra politcs
Marathi Get Classical Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला; पण 'अभिजात भाषा' म्हणजे काय?

गेल्या काही महिन्यांपासून मराठी कुटुंबांविरोधात परप्रांतीयांची ही मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्कात एका परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी तरुणांना मारहाण केल्याची घटना घडली होती. मुंबईजवळील कल्याणमध्येही अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने मराठी माणसाला मारहाण केली होती.

अखिलेश शुक्ला याने १० ते १५ जणांच्या टोळीला बोलावून मराठी कुटुंबातील तिघांना जबर मारहाण केली होती. तर काही दिवसांपू्वी मुलुंडमध्येही परप्रांतीयाने मराठी कुटुंबावर अरेरावी केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाला चोप दिला होता. तर उल्हासनगरमध्येही आरपीएफ जवानाने मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा, अशी मुजोरी मनसे पदाधिकाऱ्यासमोर दाखवली होती. यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नसल्याचेही आरपीएफ अधिकाऱ्याला ठाऊक नव्हतं.

दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सांताक्रुज परिसरात एका परप्रांतीयाने मराठी माणसाला धंदा करण्यास मज्जाव करत मारहाण केली होती. पोलिसांत तक्रार केल्यानंतरही परप्रांतीयाने मराठी माणसाचे डोके फोडले होते. दुसरीकडे मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याचेही प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणाऱ्या घटना वाढत असल्याने मराठी माणूसच महाराष्ट्रात असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. परप्रांतीयाच्या मुजोरीनंतर मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषिकांशी झालेल्या दुजाभावावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळ सन्मान सोहळ्यात कडक इशारा दिला होता. 'मराठीला कोणी कमी लेखत असेल तर सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरी परप्रांतायांची मुजोरी सुरुच असल्याचे दिसत आहे. मुंबई, महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढू लागल्याने राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

maharashtra politcs
Marathi Language Dispute : मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO

समाजातील सलोखा बिघडू न देणे ही सरकारची जबाबदारी - वर्षा गायकवाड

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम सुरु आहे. जातपात, भाषेच्या वादामुळे समाजात तेढ निर्माण होतेय. लोकांमध्ये कायद्याचा धाक दिसत नाही. राजकीय नेत्यांकडून सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली जातात. एकमेकांमध्ये द्वेष पसरवला जातोय. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. बीड आणि परभणीतही जातीयवादातून अशा घटना घडल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. सामजिक सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे'.

maharashtra politcs
Marathi Language : सरकारी, निमसरकारी, पालिका ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

... तर खपवून घेणार नाही - केशव उपाध्ये

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, अत्यंत स्पष्ट आहे की, महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा सन्मान असलाच पाहिजे. मराठी माणसांवर अन्याय होत असेल, तर खपवून घेतलं जाणार नाही. त्याला कायद्याचा बडगा दाखवला जाईल. विरोधकांना टीका करायला आता मुद्दा नाही. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यांवर टीका करू लागले आहेत. दुर्दैवाने अशा घटना घडल्या, त्यावेळी सरकारने दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणावर कोणी व्यक्त होत आहे, त्यावर आमचं म्हणणं नाही. या प्रकरणात कारवाई १०० टक्के होईल. महाराष्ट्रात मराठी माणसांचा सन्मान ही प्राथमिकता सर्वांची असली पाहिजे'.

maharashtra politcs
Marathi language Disrespect : महाराष्ट्रात चाललंय काय? मला मराठी येत नाही, माझी तक्रार करा; उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी, VIDEO

... तर आम्ही मनसेचा दणका दाखवणारच - संगीता चेंदवणकर

मनसेच्या संगीता चेंदवणकर म्हणाल्या की, सत्ता या लोकांची आली आहे, त्यांनी हिंदूत्वाच्या नावाखाली मराठी माणसांची गळचेपी सुरु केली आहे. परप्रांतीयांची मुजोरी यामुळेच वाढली आहे. हिंदूत्वाच्या नावाखाली मतदान घेतलं. आता त्याच्या नावाखाली मराठी माणसांना त्रास देऊ लागले आहेत. या गोष्टी थांबल्या पाहिजे. उल्हासनगरमधील आरपीएफ जवानाचं विधान तुम्ही ऐकलं असेल. महाराष्ट्रात परप्रांतीयांची अरेरावी वाढत चालली आहे. मात्र, आम्ही मराठी भाषेचा मुद्दा सोडणार नाही. आम्ही आवाज उचलणार. मनसेचा दणका आम्ही दाखवणारच. परिस्थिती भयानक आहे. भविष्यात मराठी माणसांना महाराष्ट्रात कुठे स्थान राहणार नाही. त्यामुळे आता आशेचा किरण राजसाहेब आहेत. राजसाहेब नक्कीच बदल घडवतील. मराठी माणसांवर जिथे अन्याय होईल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक तिथे नक्कीच उभा राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com