

दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापलं.
भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले.
बकरी ईदच्या नमाजदरम्यान मंदिर प्रवेशावर निर्बंध.
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरातील दुर्गाडी देवी मंदिर आणि ईदगाहच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदच्या दिवशी मंदिर प्रवेशबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने मंदिरात भाविकांना प्रवेश देण्याची मागणी करत रस्त्यांवरील नमाज पठणाला विरोध दर्शवला आहे.
यासंदर्भात कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा केली. 27 मे रोजी बकरी ईद साजरी होणार असून, दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. त्याच परिसरात दुर्गाडी देवीचे मंदिर असल्याने नमाज पठणाच्या कालावधीत मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर काही काळ निर्बंध घालण्यात येतात. या विरोधात शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून घंटानाद आंदोलन केले जात आहे. यंदा भाजपानेही हा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला आहे.
भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांना निवेदन देत रस्त्यावरील नमाज पठण थांबवावे तसेच दुर्गाडी मंदिरावरील प्रवेशबंदी हटवावी, अन्यथा बकरी ईदच्या दिवशी हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर डीसीपी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीत सर्वांनी आपापली भूमिका मांडत प्रत्येक धर्माला समान अधिकार मिळाले पाहिजेत, मात्र हिंदू भाविकांवरच निर्बंध का लादले जातात, असा सवाल उपस्थित केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी हिंदू भाविकांना मंदिरात दर्शनाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, या मुद्द्यावर ठाकरे गटाने भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही.
त्याच सरकारमधील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे, ही बाब लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी केला. बकरी ईदच्या दिवशी नमाज पठण, मंदिर प्रवेशबंदी आणि विविध संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि परिस्थिती कशी हाताळते, याकडे आता कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.