२७ गाव संघर्ष समितीकडून KDMC निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन
६ पॅनलवर थेट परिणाम
प्रभागातील राजकीय गणिते बदलणार
उमेदवारी दाखल केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांच्या प्रश्नावर २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मोठा आणि आक्रमक निर्णय घेतला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी २७ गावांतील निवडणुकीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन समितीने केले आहे.
समितीने स्पष्ट इशारा दिला असून, या निर्णयाला डावलून कोणीही निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली, तर समिती सक्रीय आणि कठोर भूमिका घेईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे केडीएमसीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या बहिष्काराच्या निर्णयाचा प्रभाव थेट पॅनल क्रमांक १३, १६, १७, १९, ३० आणि ३१ या सहा पॅनलवर होणार असल्याने त्या प्रभागांतील राजकीय गणिते पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांच्या स्वतंत्र हक्कांबाबत आणि दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णायक पवित्रा घेतल्याचे समितीने सांगितले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत २७ गावांच्या न्याय्य मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुमित वझे (२७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती पदाधिकारी) म्हणाले, हा निर्णय कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून २७ गावांच्या हक्कांसाठी आहे. आमच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून जर कोणी उमेदवारी दाखल केली, तर समिती त्याविरोधात सक्रीय आंदोलन करेल. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांपुढे आता २७ गावांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.