Maharashtra Weather Updates: यंदा उशीरा का होईना, राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. मात्र, असं असलं तरी मुंबई कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भात पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याचं शेतकरी सांगत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? याची वाट बळीराजा पाहत आहे.
अशातच हवामान खात्याने पावसाबाबत (Weather Updates) मोठी अपडेट दिली आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यामध्ये काही ठिकाणी बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार (Rain Alert) पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारी पावसाने पुन्हा पुनरागमन केलं. पहाटेपासूनचं मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, लोअर परळ, परळ भागात पावसाला जोरदार पाऊस झाला. आता पुढील ७२ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याने पुढील ४ दिवसांत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्हयासह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याशिवाय पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.