.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
केडीएमसीकडून फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात आंदोलन
शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
अरविंद मोरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला
फेरीवाल्यांनी फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी केली
कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारे शहरप्रमुख रवी पाटील आहेत. तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होत जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट पक्षातील नेत्यांवरच टीका केली. त्यामुळे या वादाची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी एका फेरीवाल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ते आणि रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात फेरीवाले नेते भाऊ पाटील यांनी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
भाऊ पाटील यांचे म्हणणे आहे की, 'डोंबिवली शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते, पथविक्रेते, हातगाडी वाले, मच्छी विक्रेते, पथारी वाले यांच्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरु आहे. ही कारवाई करत असताना महानगरपालिका फेरीवाला कायद्याचे कोणतेही नियम पाळत नाही. मोठमोठ्या भांडवलदारांच्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेऊन जाणीवपूर्वक फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.
'१५० मीटरच्या नावाखाली संपूर्ण डोंबिवली शहरात कारवाई सुरू आहे. गेल्या १२ वर्षांत महानगरपालिकेने फेरीवाल्यांचे कोणतेही पुनर्वसन केले नाही आणइ अधिकृत असल्याचे परवाने ही दिले नाही. उलट भरमसाठ हप्ते घेऊन फेरीवाल्यांना देशोधडीला लावले आहे. महापालिकेने तातडीने फेरीवाला धोरण लागू करावे आणि फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.', अशी मागणी भाऊ पाटील यांनी केली आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनाला अरविंद मोरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत पाठिंबा दिला. त्यांनी प्रशासनाने फेरीवाला धोरण त्वरित लागू करण्याची मागणी केली. मात्र यावेळी त्यांनी आपल्या पक्षातीलच कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या ठिकाणी तुम्ही लीडरशिप करता तिथेच बुडाखाली अंधार असतो. कोणासाठी लीडरशिप करता? बिल्डर लाईनमधील किती लफडी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, असे वक्तव्य अरविंद मोरे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे रवी पाटील हे सातत्याने फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी करत आहेत. त्यांनी यापूर्वीही केडीएमसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांच्याच पक्षातील जिल्हाप्रमुखांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार, तसेच रवी पाटील यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले. महापालिकेने फेरीवाला धोरण तातडीने राबवावे आणि पथविक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. डोंबिवली फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.