दिल्ली-मुंबईसह ७ महत्त्वाच्या रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला मंजुरी
७ हाय-डेंसिटी कॉरिडॉर भारतीय रेल्वेच्या जवळपास ४०% वाहतुकीशी संबंधित
चौपदरीकरणामुळे अधिक गाड्या चालवणे आणि रेल्वे वाहतूक सुरळीत करणे शक्य होणार
सर्व प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील वाढती रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी ७ महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण (4-लेन) करण्याच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये देशातील अत्यंत महत्त्वाच्या दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. रेल्वेच्या मार्गांवरील वाहतूक सुरळीत करणे हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील सुमारे ११ हजार किलोमीटर लांबीचे ७ हाय-डेंसिटी रेल्वे कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचे आहेत. या मार्गांवर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असून, त्यापासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरू आहे. दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता आणि कोलकाता-मुंबई या मार्गांचा समावेश असलेला गोल्डन क्वाड्रिलॅटरल रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सात प्रमुख कॉरिडॉर भारतीय रेल्वेच्या एकूण वाहतुकीपैकी जवळपास ४० टक्के वाहतूक हाताळतात. यापैकी सुमारे २,००० किमी मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे, तर सुमारे ५,००० किमी मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
याशिवाय, पाच राज्यांतील १४ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ६५६ किमी रेल्वे नेटवर्क वाढणार असून, त्यासाठी अंदाजे १०,७८३ कोटी खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतील १७ जिल्ह्यांमध्ये आणखी ५ मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ५४० किमी रेल्वे नेटवर्कमध्ये वाढ होणार असून, त्यासाठी अंदाजे १०,०२१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे सर्व प्रकल्प २०२९ - ३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
चौपदरीकरणामुळे एकाच मार्गावर अधिक गाड्या चालवणे शक्य होणार असून, रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहेत. परिणामी ट्रेन उशिरा धावण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः दिवाळी, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि इतर सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी रेल्वेचा वापर करतात. अशा काळात अतिरिक्त गाड्या चालवण्यासाठी चौपदरीकरणाचे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. एकूणच, रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे देशातील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, सक्षम आणि गर्दीमुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.