
चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव या शहरातील विविध समस्या घेऊन 'मी पुलगावकर' या नावाखाली अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. मागील सहा दिवसांपासून हा आंदोलन सुरु असून पहिल्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले, तर नंतर पाच दिवसांपासून दोन आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. सहा दिवसांपासुन सुरु असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन मात्र लक्ष देत नसल्याने आज थेट पुलगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. पुलगाव शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज शहर कडकडीत बंद आहे.
पुलगाव येथील अंकुश कोचे यांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला एक महिन्यापूर्वी निवेदन सादर केले होते. या निवेदनाची कोणतीही प्रशासनने दखल न घेतल्यामुळे अंकुश कोचे व गजानन पचारे यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केलीय. 'मी पुलगावकर' या नावाखाली सुरु झालेल्या या आंदोलनाला विविध संघटनानी समर्थन देखील दिले आहे. सहा दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलन दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने रक्तदान करत समर्थन दिले, तर शुक्रवारी रस्ता रोको करत सरकारचा निषेध केला. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शनिवारी पुलगाव बंदची हाक देण्यात आलीय. पुलगाव बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सोबतच जनता आता स्वतः आंदोलनाला समर्थन देत असून शासनाने तातडीने मागण्या सोडवाव्या अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनीष साहू यांनी केलीय.
पुलगाव शहरातील मागील सहा-सात वर्षांपासून अनेक समस्या आहे. गावातील नागरिकांना शिधापत्रिका बनविण्यासाठी देवळी येथे जावे लागते. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा देवळी येथे जाऊन कागदपत्र तयार करावे लागते. सोबतच पुलगाव येथील रेल्वे उड्डाणंपुलाचे काम बंद असून तेथील रेल्वे गेट हा अंडरपासच्या नावाखाली बंद करण्यात आला मात्र तेथे अंडरपास सुद्धा काम बंद आहे. यामुळे अनेक नागरिकांना चार किलोमीटरचा फेरा मारून जावा लागतो. सोबतच ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरची कमतरता, नगरपालिकेकडून सुरु असलेल्या कामात भ्रष्टाचार, नियमित शहरात न होणारा पाणीपुरवठा या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी हा आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला अद्याप एकही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाहीय, एवढच नव्हे तर भेट देण्यासाठी येणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन संपविण्याच्या दृष्टीने कोणतेच पाऊल उचलले नाहीय. यामुळे प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल आंदोलक अंकुश कोचे व गजू पचारे यांनी केलाय.
सहा दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची सरकार व प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. आज पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे या समस्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.