अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना: ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचं आज निधन झाले. दुपारी साडेबारा वाजता त्यांनी जालना येथे राहत्या घरी आपला अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ते आजारी होते. सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या शब्बीर अन्सारी यांनी ओबीसींच्या व्यापक चळवळीमध्ये सहभाग घेत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित केले होते. नुकताच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
आज रात्री इशा नमाजनंतर 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर नामाज ए जनाजा अदा करून जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार (दफनविधी) करण्यात येतील.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अन्सारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे. शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे.
शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. 'मंडलनामा' या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या हक्कासाठी सदैव प्रेरणा देत राहील. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे.
अन्सारी साहेबांनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला लढा हा केवळ मुस्लिमांसाठी नसून तो संपूर्ण वंचित घटकांसाठी होता. स्व. विलासराव देशमुख, शरद पवार साहेब यांच्यापासून ते युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढला. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. एक सच्चा आणि लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अन्सारी परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. असे भुजबळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.