

मुंबई आणि पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. अशातच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक संथ झाली. दुसरीकडे याच पावसादरम्यान हजारो कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, एखादी भाषा वाईट नसते. मात्र महाराष्ट्रावर प्रत्येक गोष्ट लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याविरोधात जागरूक राहणे गरजेचे आहे. "बेसावध राहू नका. पायाखालची जमीन गेली तर ती पुन्हा सहज मिळत नाही," असे सांगत त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केलं.
रेल्वे भरती, रेल्वे स्थानकांवरील निर्णय आणि स्टॉल कुणाला दिले जात आहेत, याकडेही नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले. "आपण दुर्लक्ष केलं, तर पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते," असा इशाराही त्यांनी दिला. याचवेळी राज्य सरकारलाच हिंदीबाबत विशेष आस्था असल्याचा टोला लगावत त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचाही उल्लेख केला.
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील खांब कोसळल्याच्या घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलंय. "पाऊस पडला, खांब कोसळला आणि त्यावर प्रश्न विचारला की म्हणतात, याचं राजकारण करू नका. पण मग इतके दिवस विरोधात असताना तुम्ही काय करत होतात? दुसऱ्यांचं सरकार असताना आंदोलनं केली, आरोप केले, ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण कसं होतं?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "एकवेळ माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही," असं म्हटलं होतं. त्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय. "आज अशी सवय लागली आहे की, केंद्र सरकारच्या कामावर प्रश्न विचारला तर देशविरोधी ठरवलं जातं. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान झाल्याचं सांगितलं जातं. मग लोकांनी सरकारला प्रश्न विचारायचेच नाहीत का?" असा सवाल ठाकरेंनी केलाय.
राज ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरूनही भूमिका स्पष्ट केली. "राम मंदिरातील चोरीबाबत बोललं की धर्माचा अपमान झाल्याचं सांगितलं जातं. पण मंदिराबद्दल आमच्याही मनात श्रद्धा आहे. देशातील प्रत्येक श्रद्धाळू माणसाच्या मनात आस्था आहे. लोकांनी श्रद्धेने दानपेटीत टाकलेल्या पैशांची चोरी होत असेल, तर त्यावर बोलायचं नाही का?"
राज ठाकरे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचीही तुलना केली. "पूर्वी हजार मिलिमीटर पाऊस पडला तेव्हा मुंबईची अवस्था बिकट झाली होती. यावेळी सुमारे ३०० ते ३५० मिलिमीटर पाऊस झाला, तरी मुंबई पुन्हा तुंबली. विरोधात असताना याच गोष्टीवर मोठी आंदोलनं झाली, सरकारवर आरोप झाले. पण आता मुंबई तुंबली तर ते नैसर्गिक असल्याचं सांगितलं जातं. हा दुटप्पीपणा का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.