
सांगली : रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन सध्या वादंग सुरु आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. त्या आशयाचं पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या वादात आता शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेतलीय. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याची सत्य कथा सांगत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत बोलत होते.
संभाजी भिडे गुरुजींनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, संभाजीराजे भोसले म्हणतात ते १०० टक्के चुक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे ते स्मारक केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे, याचं प्रतिक म्हणून वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथंच पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मत बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही. पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही, असही संभाजी भिडे म्हणाले.
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.