Success Story: सोलापूर शहरातील प्रज्ञा चौधरी यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत महाराष्ट्र शासनाच्या मुख्याधिकारी पदावर निवड मिळवली आहे. सामान्य कुटुंबातील मुलीने संघर्ष, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे याआधी त्यांची सहायक कक्ष अधिकारी पदावरही निवड झाली होती.
प्रज्ञा चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर हरीभाई देवकरण प्रशाला आणि दयानंद महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच प्रशासन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
त्यांच्या वडिलांनी स्वतः स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला होता. मात्र योग्य संधी आणि परिस्थितीअभावी त्यांना यश मिळू शकले नाही. त्यांनी आपले अपूर्ण स्वप्न मुलीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार केला. दहावीच्या सुट्टीत विविध अधिकाऱ्यांची पुस्तके वाचण्यासाठी दिल्यानंतर प्रज्ञा यांच्या मनात अधिकारी होण्याची प्रेरणा निर्माण झाली.
घरची आर्थिक परिस्थिती साधारण होती. वडिलांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले, मात्र परिस्थिती स्थिर नव्हती. अशा वेळी सरकारी नोकरीमुळे आयुष्याला स्थैर्य मिळेल आणि समाजासाठी काम करता येईल, या विचाराने त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
हा प्रवास मात्र अत्यंत कठीण होता. शिक्षणादरम्यान त्यांना किडनी स्टोनचा त्रास सहन करावा लागला. तब्बल तीन ते चार वर्षे आरोग्याच्या समस्यांशी झुंज देतानाही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. त्याचवेळी कौटुंबिक संकटांनीही त्यांची परीक्षा घेतली. २०२२ मध्ये मेन्स परीक्षेच्या काळात मामांचे आणि काकांचे निधन झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना मुलाखतीसाठी जावे लागले. मुलाखतीपर्यंत पोहोचूनही केवळ ०.७५ गुणांनी पद हुकले.
तरीही त्यांनी हार मानली नाही. स्वतःच्या चुका ओळखून त्यांनी अभ्यासाची दिशा बदलली. पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास, टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिका आणि नियमित वर्तमानपत्र वाचन यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. डेक्कन अकॅडमीचे शेळके सर, स्टेप अप अकॅडमीचे खाटेकर सर आणि इरा अकॅडमीचे संकल्प देशमुख सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
अखेर आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि मेरिट लिस्टमध्ये स्वतःचे नाव पाहताच त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचे चीज झाले. आज त्या महाराष्ट्र शासनात अधिकारी म्हणून कार्यरत असून महिला सक्षमीकरण आणि प्रशासन क्षेत्रात योगदान देत आहेत. “अपयश म्हणजे शेवट नाही, तर सुधारण्याची संधी आहे,” हा त्यांचा संदेश आज अनेक तरुणांना प्रेरणा देत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.