उद्याची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली
हायकोर्टाचा निर्णय अन् विरोधक भडकले
राज ठाकरेंनी ४ शब्दांत सरकारला सुनावले
आज राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, या मतदान प्रक्रियेत जनतेला अनेक त्रुटींचा सामना करावा लागला आहे. काही मतदान बूथवरील इव्हिएम मशीन बंद पडले. तर, काही भागांमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने सामने आले. तर, काही प्रभागात न्यायालयीन पेच निर्माण झाल्यानं आज नसून २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. याच कारणामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान, सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल एकाच दिवशी जाहीर न झाल्यास, २० नगरपरिषदांच्या निकालावर थेट परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या युक्तीवादावर सुनावणीदरम्यान, नागपूर खंडपीठाने निकाल २१ डिसेंबर म्हणजेच एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच २० डिसेंबरला मतदान झाल्याच्या अर्धा तासानंतर एक्झिट पोल प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधकांनी सरकारला धाऱ्यावर धरलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या निकालावर आणि प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ४ शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देशात मनमानी सुरू आहे', अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना महिला नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
हा मतचोरीचा तर प्रकार नाही ना? वडेट्टीवारांना संशय
या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणतात, 'उच्च न्यायालयाच्या नागपूरच्या खंडपीठाने दिलेला आदेश म्हणजे निवडणुकीचा खेळखंडोबा झालाय. हा पोरखेळ आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आलाय. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे दाखवायचे होते. हे सरकार कोणत्या दिशेने काम करते?' असा थेट सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
'उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला ढकलली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. इतक्या निवडणुका झाल्या याआधी असे कधीच झाले नव्हते. फडणवीस सरकार जबाबदार आहे', असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. 'मतमोजणीत अडथळा येणे म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशांचा वापर होतोय. मत चोरीचा हा प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जातोय' असंही वडेट्टीवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.