

लग्नानंतर महिनाभरातच पती-पत्नीचे मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळले. यवतमाळमधील मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे काल, सोमवारी रात्री उशिरा ही हृदयद्रावक घटना घडली. या दोघांनी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
करिश्मा आणि आशिष धानोरकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मारेगाव तालुक्यातील सगणापूर गावाजवळच्या विहिरीत या दोघांचे मृतदेह आढळले. लग्नानंतर महिनाभरात ही दुर्दैवी घटना घडली. दोघांच्या मृत्यूने सगणापूर गावासह तालुक्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
करिश्मा आणि आशिष धानोरकर यांचं ४ मे २०२६ रोजी वणी येथे लग्न झालं होतं. दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती. पण अवघ्या महिनाभरातच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज प्राथमिक तपासातून व्यक्त केला जात आहे. पण दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
करिश्मा आणि आशिष हे दोघे रात्री साधारण साडेआठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून निघाले. बराच वेळ उलटला तरी दोघे घरी परतले नाहीत. काळजी वाटू लागल्यानं कुटुंबीयांनी या दोघांचा शोध सुरू केला. त्याचवेळी कुटुंबीय गावाजवळच्या विहिरीजवळ पोहोचले. या विहिरीत बघितले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या दोघांचेही मृतदेह विहिरीत आढळून आले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्याचे शाम वानखेडे हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या पोटाला दोरी आणि दगड बांधलेले होते. या दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. करिश्मा आणि आशिष यांनी आत्महत्या का केली असावी, यामागे नेमके काय आहे? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.