Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे होते म्हणून निवडणूकीत त्यांना नावे ठेवली; मेघना बोर्डीकर

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 13 April 2025: आज रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा, राजकीय घडामोडी, मुंबई लोकल मेगा ब्लॉक, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे होते म्हणून निवडणूकीत त्यांना नावे ठेवली; मेघना बोर्डीकर

निवडणुकीच्या वेळेस व त्या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे होते म्हणून त्यांना नावे ठेवली गेली त्याचबरोबर या ठिकाणी सतत जातीपातीचे राजकारण चालू आहे. अनुसूचित जातीच्या लोकांना सांगितलं की संविधान बदलणार मुस्लिम बांधवांना सांगितले की तुम्हाला या देशाच्या बाहेर काढणार तुमच्या नागरिकत्व धोक्यात येणार आणि आपल्या मराठवाड्यात अत्यंत जातीपातीचे घाणेरडा राजकारण या मंडळींनी केलं केवळ ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस होते म्हणून त्यांना नाना तरी चे नावे ठेवली गेली आणि माझ्या बाबतीतही असेच नावे ठेवली गेली.

बीडच्या माजलगावात शिवसेना उबाठा गटाकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ

बीडच्या माजलगांवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.बीड जिल्ह्यात आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी प्रत्येक पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजलगाव मध्ये सदस्य नोंदणी करण्यात आली आहे अनेक नागरिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. या नोंदणीची सुरुवात माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटातील मोठे नेत्यांचा लवकरच शिंदे गटात होणार प्रवेश

शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांचा दावा

आज दहिसर येथील माजी नगरसेविकाने आपल्या पतीसह शिंदे गटात प्रवेश

शिल्लक सेनेतील उरलेले लोक इकडे प्रवेश करताना दिसतील

मोठे मोठे प्रवेश येणाऱ्या महिन्यात दिसतील.

जळगाव चोपडा तालुक्यातील काही भागात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी

तालुक्यातील पूर्व भागात आज सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. भागातील खेडीभाकरी,गोरगावले, मंगरूळ,लोणी पंचक वटार सुटकार गोरगावले नारद खरद धानोरा बिडगाव मितावली मोहरद हे पूर्व भागातील गावांना आज झालेल्या वादळी वारा व हरभरा व बोरा एवढी गारपीठ झाली. थोड्याफार प्रमाणात गारपिटीचा फटका केळी बागेतील केळी झाडांची पाने फाटली आहेत यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. तर शेतात कापणी केलेला मका या पिकांना बसला असून,चाऱ्याचेही नुकसान झालेले आहे.

सायन पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

नेरुळ ते बेलापूर पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालीय.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा.

मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.

दुचाकीवर झाडाची फांदी पडल्यानं, महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

नाशिक – शहरातील गंगापूर रोडवरील सोमेश्वर बस स्टॉपजवळ आज सकाळी एक दुर्देवी घटना घडली. गंगापूर गावाकडून शिवाजीनगरकडे जात असताना दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या महिलेवर झाडाची मोठी फांदी कोसळली. या दुर्घटनेत महिलेला आपला जीव गमवावा लागला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

"मी कुठेही गेलो नाही, एकनाथ शिंदे यांचा फोनही आला नाही" – भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि भरत गोगावले मुंबईला रवाना झाले या बातमीवर गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय. "कुणीतरी सुत्रांनी चुकीची बातमी चालवली. मी कुठही गेलो नाही. मतदार संघात आहे. एकनाथ शिंदे यांचा आज फोन आलेला नाही", असं गोगावले म्हणालेत.

नाशकात मुसळधार पाऊस, कांदा, गहू, द्राक्षाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकच्या शिरवाडे-वणी परिसरात दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारा व पावसाने हजेरी लावली असून, अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू या बरोबर द्राक्षांना त्याचा फटका बसल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय.

वर्ध्याच्या तळेगाव श्यामजीपंत येथील बॅट अँड बॉल रेस्टॉरंटला आग

- आर्वीतील कार्यक्रम आटोपून पालकमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हॉटेल मध्ये काही लोकांना आले होते भेटायला.

- भेटून पालकमंत्री निघत असतांना दिसली आग

- राष्ट्रीय महामार्ग 6 वर असलेल्या हॉटेलला आग लागल्याने एकच खळबळ

- हॉटेलला लागूनच आहे पेट्रोल पंप

नांदेडमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

नांदेडमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकऱ्यांनी बैठक घेऊन जमीन सीमांकनाला दर्शवला विरोध

15 तारखेला महामार्ग प्रशासनाच्या वतीने मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात केले जाणार आहे जमिनीच सीमांकन.

शेतकरी करणार तीव्र विरोध बैठकीत एकमुखाने निर्णय.

धुळे येथील मोहाडी गावात आई पिंपळादेवी मातेच्या यात्रोत्सवाला भाविकांच्या उस्फुर्त प्रतिसाद

चैत्र उत्सव सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सवाला सुरुवात होत असते धुळ्यात देखील सालाबादप्रमाणे यंदाही पिंपळादेवी मातेच्या यात्रोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते, या यात्रोत्सवात मोहाडी गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली

एकनाथ शिंदे यांची मी संध्याकाळी भेट घेणार आहे. ते एक तास का भेटले मी त्यांना विचारीन आणि त्यातले किस्से एकदा काही सांगितले तर मी पत्रकारांची शेअर करेन.
उदय सामंत

Maharashtra News Live Updates :

मंत्री भरत गोगावले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप पाठवण्यात आला आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

अमित शहा राजगडावर नतमस्तक झाले आनंदाची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची संकल्पना सर्व समावेशक लोककल्याणकारी राज्याची प्रेरणा घेतली असावी अशी अपेक्षा आहे.

रेणुका देवीच्या वहन मिरवणुक..हजारो भाविकांची उपस्थिती..

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका देवीची यात्रा महोत्सव सुरू आहे ... यात्रेचे दुसरे महत्वाचे आकर्षण म्हणजे रेणुका देवीची वहन मिरवणूक .. रेणुका देवीचे वहन मिरवणुक ला रात्री आरती नंतर सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी याठिकाणी गर्दी केलीय.. आज दुपारपर्यंत ही वहन मिरवणूक चालणार असून दुपारी परत मंदिरात पोहचेल .. वाजत गाजत रेणुका देवी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालत असते , यालाच वहन मिरवणूक म्हणतात .. तर या वहनाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते.

यावर्षी 103% पाऊस, अजित पवार यांनी दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी

एकंदरीतच यंदा चांगली बातमी आपल्याला सुरुवातीलाच ऐकायला मिळाले आहे हवामान खात्याने सांगितला आहे की नवीन येणाऱ्या पावसाळ्यात 103% पाऊस पडणार आहे नेहमीच्या पेक्षा तीन टक्के पाऊस जास्त पडणार असल्याने ही एक समाधानाची बाब आहे पाऊस काळ चांगला झाला तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांना आनंदच होत असतो त्याचबरोबर आम्हालाही समाधान होत असते कारण पाऊस काळ चांगला झाला तर इतर कामांना गती देता येते पाऊस काळ कमी असला की दुष्काळ पडला की पिण्याचे पाणी रोजगार हमीची कामे फल उत्पादन योजनेची कामे ममरेगाची कामे या कामांना प्राधान्य द्यावा लागतो पावसा बद्दल जो अंदाज व्यक्त केला आहे.

मागच्या काळात महाराष्ट्राच्या काही लोकांचा आवाज चालत होता मात्र आता दिल्ली दरबारीं मुख्यत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला शब्द खाली जातं नाही.
अमर काळे

आई राजा उदो उदो च्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने घेतले येडेश्वरी देवीचे दर्शन

तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सव सुरू असुन या याञा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम आज चुन्याच्या राणात पार पडलाय.यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते.येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदीरातुन आठवडी बाजार मार्गे आंबराईच्या राणात नेण्यात आली यावेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

nashik-manmad-मनमाड-शिर्डी मार्ग उद्या बंद राहणार

मनमाड शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असते यावेळी दुपार नंतर संध्याकाळी शहराच्या विविध भागातून सुमारे ५० पेक्षा जास्त चित्ररथ आणि होणारी गर्दी यामुळे इंदौर-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूकीला उद्या सकाळ पासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे.तर मनमाड बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटे सोडण्यात येणार आहे.मिरवणूकीमुळे महामार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता मालेगावकडून होणारी वाहतूक चांदवड-विचूर-लासलगाव-येवला मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे तर येवला येथून होणारी वाहतूक विंचूर-लासलगाव-चांदवड मालेगाव कडे जाणार आहे.त्यामुळे अवजड वाहतूकीसह प्रवास करणा-यांना लांबचा प्रवास करावा लागणार असून उद्या सकाळी अकरा वाजे नंतर संपुर्ण वाहतूक बंद राहणार असल्याने तब्बल १३ तासपेक्षा जास्त वेळ वाहतूक बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

खाजगी रुग्णालयाचे दर निश्चित होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सरकारने खासगी रुग्‍णालयांचे दर निश्चित केले पाहिजेत का? गेल्‍या पाच वर्षात रुग्‍णालयाने अनावश्यक चाचण्‍या किंवा अवाजवी चाचण्‍या केल्‍या का? आदी प्रश्नांवर नागरिकांची मते ऑनलाइन स्‍वरूपात पुण्‍यातील ‘पेशंट्‌स राईटस नाऊ या फोरम कडून मागितली जात आहेत. संपूर्ण देशभरातून पाच लाख नागरिकांचे मते यामध्‍ये मागितली जाणार असून ही माहिती ‘जन स्‍वास्‍थ्‍य अभियान’ ने सर्वोच्‍च न्‍यायालयात खासगी रुग्णालयावर दरनिश्चिती करण्‍याबाबत दाखल केलेल्‍या याचिकेत सादर होणार आहेत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण डेटा सध्या गोळा केला जातोय. हा डेटा लवकरच सुप्रीम कोर्टात दिला जाईल आणि त्यानंतर अपेक्षा आहे की देशातील सर्व रुग्णालयात समान दर निश्चित केले जातील.

nashik-yeola-शेळ्यांचे गोठ्यावर वीज पडली

नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात काल विजांच्या गडगडटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती,संध्याकाळच्या सुमारास मातुलठाण येथे येथील एका शेतकऱ्याच्या शेळ्या बांधण्यासाठी उभ्या केलेल्या शेडवर वीज पडून शेड ला आग लागली,सुदैवाने शेळ्या बाहेर असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही,परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा पर्यंत केला मात्र तो पर्यंत शेड जाळून खाक झाले त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

गुलाबराव पाटील हे विविध संदर्भ देऊन बोलत असतात.. परिस्थिती काय होती आणि काय संदर्भ घेऊन बोलले आहेत याची मी माहिती घेतो.. त्यानंतर खुलासा देतो.
संजय राठोड, जलसंधारण मंत्री...

अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंकेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धेत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे दौऱ्यावर येत आहे. आर्वी येथे 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहे. आर्वी शहरातील प्रशासकीय भावनाचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अनेक दिवसांपासून आर्वीकरांना या प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे हे सध्या आमदार आहेत तर विधान परिषद मध्ये माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपने घेतल्याने या मतदारसंघात भाजपचे दोन आमदार आहे. तर वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे हे सुद्धा आर्वी शहरातले निवासी असल्याने या समारोहात मुख्यमंत्री काय बोलतात याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अडकला ट्रेलर

वेगवेगळ्या कारणाने समृद्धी महामार्ग हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र आज समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळील चॅनेज 268 वर लोणी गवळी गावाजवळील पुलाखालून जाणारे एक भलं मोठं ट्रेलर जवळपास दोन तास अडकून पडलं होतं. दोन तासाच्या अथक प्रयत्न नंतर हे ट्रेलर काढण्यात यश मिळाले . यादरम्यान एक लेन वरून वाहतूक दोन तास बंद ठेवावी लागली. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच व जड वाहनांमुळे समृद्धी महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदेडच्या डोणगावात कावड यात्रा उत्साहात

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोणगाव येथे बारस यात्रेनिमित्त काठ्या कावडीची मिरवणूक काढण्यात येते. जवळपास साडेतीनशे वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जोपासली आहे. हजारो महिला, पुरुष भाविक यात्रेत सहभागी झाले होते. पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात.

रांगोळीतून साकारली आंबेडकरांची प्रतिमा.. तब्बल ९ तासाचा लागला कालावधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित वाशीम येथील रांगोळी कलाकार सचिन दामोदर यांनी भीम नगर वाशीम येथील बुद्ध विहारात ५ बाय ७ फुटाची सुंदर अशी बाबासाहेबांची रांगोळीच्या माध्यमातून प्रतिमा साकारली आहे, ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल ९ तास वेळ लागला आहे, विहारात वंदन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ही रांगोळी भुरळ पाडत आहे.

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाला मिळाला मुहूर्त

महा मेट्रो कडून विविध प्रसिद्ध तीन ते चार महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र या मार्गावर दोन स्थानकांचा समावेश करण्यात आला नव्हता. पद्मावती आणि बिबेवेवाडी या दोन स्थानकांचा आता समावेश झाला असून नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांची छाननी केल्यानंतर येत्या तीन ते चार महिने या कामाला सुरुवात होईल.

सलग सुट्ट्यांमुळे पंढरीत भाविकांची मोठी गर्दी

सलग सुट्ट्यांमुळे पंढरीत भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज रविवार असल्याने सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेली आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी काही तासांचा कालावधी लागतो आहे.

पुरुष आयोगाच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर धरणे

- पुरुषांवर होणारे अत्याचार थांबवा म्हणत पुरुष आयोगाच्या मागणीसाठी 19 एप्रिलला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर देणार धरणे..

- सध्या अमलात असलेले सर्व कायदे हे महिलांचा बाजूने आहे, त्यात पुरुषांना स्थान नसल्यानं भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह व्यवस्था टिकवण्यासाठी पुरुष आयोगाची मागणी केली जात आहे...

- सेव्ह इंडियन फॅमिलीज तर्फे सत्याग्रह फॉर मेन असे हाक देण्यात आली असून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर स्स्त्याग्रह करत मागणी करणार आहे?

- राष्ट्रीय महिला आयोग आहे, पण कायद्याचा दुरुपयोग आणि खोट्या केसेस केल्या जात आहे. यामुळे अनेक पुरुष आत्महत्या करत आहे. एनसीसीआरबीच्या आकडेवारी नुसार 1लाख 70 हजार पुरुषांच्या आत्महत्या झाल्या आहे..

दीनानाथ रुग्णालय प्रकरणात महिला आयोगाचे कारवाईचे निर्देश

गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगेशकरने महिलेची खाजगी माहिती सार्वजनिक केल्याने महिला आयोगाची कारवाईचे निर्देश

मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला.

मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे केली

आयोगाने याप्रकरणी पोलीस आयुक्त,पुणे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत

आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सुद्धा सांगितले आहे

जालन्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दोघं जेरबंद

जालन्यात आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत 1 लाख 57 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. स्वप्नील राठी आणि मोहन खाकिवालेअशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. स्वप्नील राठी आणि मोहन खाकिवाले हे दोन तरुण आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून सदर बाजार पोलिसांनी सदरील दोन तरुणांना जुना मोंढा भागातून ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याच समोर आलं. पोलिसांनी दोन्ही सट्टेबाजांना विचारपूस केली असता त्यांनी बुकी शौर्य घोसले याच्या सांगण्यावरून सट्टा लावल्याच कबूल केलं. या कारवाईत पोलिसांनी 2 हजार रुपये रोख आणि 2 महागडे मोबाईल असा एकूण 1 लाख 57 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिका नागरिकांना लिहिणार विनंती पत्र

पाणी बचतीसाठी महापालिकेकडून नागरिकांना पत्र लिहीत विनंती केली जाणार आहे. राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरावडा साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

याच मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिका आता शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्यासाठी विनंती पत्र लिहिणार आहे .

शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली आहे. अशा स्थितीत, महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादीत असल्याने पाणी बचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे.

आधारची माहिती चुकली अन् शेतकऱ्यांना मदत हुकली

आधार कार्डची माहिती चुकीची भरल्याने जवळपास यवतमाळच्या कळंब तालुक्यातील शंभर शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चूक केली परंतु ती चूक अजूनही दुरुस्त केली नाही, कमी किंमतीत शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर केले. दोन हेक्टर पर्यंत मर्यादित असणाऱ्या या अनुदानासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला यासाठी कापूस व सोयाबीन पिकांसाठी कमाल पाच रुपये अनुदान देण्यात आले बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला परंतु जवळपास शंभर शेतकरी लाभान पासून वंचित आहे.

येडशी येथील रामलिंग अभयारण्यात आलेला वाघ पसार..? रेस्क्यू टीम परतली

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रामलिंग अभयारण्यात टिपेश्वर येथुन दाखल झालेला वाघ गेली एक महीन्यापासुन बेपत्ता झाला होता असुन वाघाचा नेमका ठाव ठिकाणा कुठे आहे याची माहिती वनविभागाकडे देखील नसल्याची माहिती समोर आली आहे.तर वाघाला पकडण्यासाठी आलेली पुण्याची रेस्क्यू टिम देखील परतली आहे.वाघाला पकडण्यासाठी सध्या कुठलेही प्रयत्न सुरू नाहीत तर गेली तीन आठवड्यापासून या वाघाने एकाही पाळीव जनावरांची शिकार केली नाही त्यामूळे हा वाघ नेमका गेला कुठे असा प्रश्न नागरीकांसह वनविभागाला पडला आहे.वाघाला पकडण्यासाठी तीन महीन्यापासुन प्रयत्न सुरू असतानाही वाघ पकडण्यात वनविभागाला आणखीही यश आलेले नाही.

नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा - उदय सामंत

रत्नागिरीतील वाढत्या अंमली पदार्थाविरोधात जिल्हाप्रशासन आता दंड थोपटलेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासकिय अधिकारी , पोलीसांची तातडीची बैठक घेत अंमली पदार्थाविरोधात कडक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी तातडीने कारवाईची विशेष मोहीम हाती घ्यावी . कोणाचाही फोन आला तर, त्याची डायरीला नोंद घ्या. असे निर्देश सामंत यांनी या बैठकित दिलेत.

Pune News : मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालय सुद्धा करणार चौकशी

मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालय सुद्धा चौकशी करणार आहे. मंगळवारपासून ससून रुग्णालयाची समिती चौकशी करणार आहे.

या सगळ्या प्रकरणी डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाला का याची चौकशी ससून रुग्णालय करणार आहे. यासह या गर्भवती महिलेला ज्या तीन रुग्णालयात उपचार देण्यात आले होते या तिन्ही रुग्णालयाच्या उपचारांची चौकशी या समितीमार्फत करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला याबाबतीत चौकशी करण्याचं पत्र लिहिलं होतं. आता ससून रुग्णालय मंगळवारपासून ही चौकशी करणार आहे.

इंदापूरात श्री ज्योतिबा देवाची यात्रा उत्साहात

असंख्य भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर शहरातील शिवकालीन प्राचीन मंदिरातील नवसाला पावणाऱ्या श्री ज्योतिबा देवाची यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलीय.सायंकाळी इंदापूर शहरातून पारंपारिक वाद्याच्या गजरात श्री ज्योतिबा देवाचा घोड्यावरुन छबीना काढण्यात आला होता.यात शेकडो भक्तगण सहभागी झाले होते.यावेळी करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

मावळच्या वडगाव मध्ये श्री पोटोबा महाराज यात्रेला सुरुवात

मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराजांच्या उत्सवास सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिषेक, छबिना, मानाच्या काठ्या, भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षीचे बगडाचे मानकरी गणेश ढोरे यांच्या हस्ते पूजा करून मानाचे बगाड कार्यक्रमास सुरुवात करण्यात येते. या वेळी अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी व बगाड पाहण्यासाठी गर्दी केली होती. वडगाव मधील श्री पोटोबा महाराज यात्रेनिमित्त शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या बगाडाला फार मोठे महत्त्व आहे. वर्षानुवर्ष ढोरे कुटुंबाकडे याचा मान असतो. पारंपरिक पद्धतीने घरापासून वाजत गाजत बगाड यात्रेला सुरुवात होते. आणि ती पोटोबा मंदिरात आल्यानंतर त्याची विधिवेत पूजा केली जाते. नवस पूर्ण करण्याकरिता किंवा ज्याचा नवस पूर्ण झाला अशा व्यक्तीला त्या बगाडावर बसून गोल फिरविल्या जाते. दरम्यान बगाड कार्यक्रम संपल्यानंतर गावोगावच्या मांनाच्या काठ्या येऊन त्याची पूजा झाल्यानंतर बगाड कार्यक्रम संपतो..

Akola News : अकोल्यातल्या पातूरात 60 वर्षीय व्यक्तीची हत्या...

अकोल्यातल्या पातूर शहरालगतच्या तुळजापूर गावठाणात रात्री उशिरा एका 60 वर्षीय वृद्धाची निघृण हत्या झाली. मुजावर पुरा येथील सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन यांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हत्या केली. घटनास्थळी एक काठी, पाण्याची बाटली आढळल्याने हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तुळजापूर गावठाण परिसरात रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. नागरिकांनी पातूर पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी सुरू केलीये. तसेच परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. मृतकाच्या मोबाइल कॉल डिटेल्सच्या माध्यमातूनही तपास पुढे नेला जात असून, हत्या कुठल्या कारणातून झाली याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू

Akola News : वृद्धाला लुटणाऱ्या तिन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

अकोल्यात 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीला दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवले आणि त्यांच्याकडील बॅग घेऊन पळून गेले होते. सिटी कोतवाली पोलिसांनी 24 तासात घटनेचा छडा लावलाये.. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. ठाकूरदास या वृद्ध व्यक्तीला अडवत त्यांच्याजवळ असलेली बॅग बळजबरीने हे तिघे जण हिसकावून पळाले होते... तपासादरम्यान, मनोज लुडेरे, रोहीत इंगोले आणि अंश पटेकर यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेली 13 हजार रोख, 100 अमेरिकन डॉलरच्या 8 नोटा, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाये..

हनुमान जयंतीनिमित्त माकडांना अनोखा पाहुणचार...चक्क माकडांची पंगत..

रविवारी संपूर्ण देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी झालीये. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द गावातही काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली... काल हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडली. निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र भगवान परमहंस श्री मुंगसाजी महाराज संस्थान श्रीराम पंचवटी कोथळी बुद्रुक येथे हनुमान जयंतीच्या निमित्याने माकडांसाठी भोजनाचं अर्थात जेवणाचं आयोजन होत. गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली होती.. विशेष म्हणजे, माकडांनीही अगदी शिस्तीत या पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारला आहे .

CM Devendra Fadnavis:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धेत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे दौऱ्यावर येत आहे. आर्वी येथे 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहे. आर्वी शहरातील प्रशासकीय भावनाचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अनेक दिवसांपासून आर्वीकरांना या प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे हे सध्या आमदार आहेत तर विधान परिषद मध्ये माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपने घेतल्याने या मतदारसंघात भाजपचे दोन आमदार आहे. तर वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे हे सुद्धा आर्वी शहरातले निवासी असल्याने या समारोहात मुख्यमंत्री काय बोलतात याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

YAVATMAL - यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून शासन आपल्या मोबाईलवर

यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनांमध्ये सुसंवाद वाढेल असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक देखील केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने युटूब चॅनल तयार करण्यात आले आहे या चैनल वर महसूल विभागाचे विविध विषय संदर्भात माहिती उपलब्ध होणार आहे.

YAVATMAL - यवतमाळची लेक बनली न्यायाधीश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात यवतमाळ येथील खेळाडू प्रजाकता जया गणेश झळके यांची न्यायाधीश पदी निवड झाली असून कठोर परीक्षामाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसनी घातली. बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाले असून एलएलबी पुणे तर एलएलएम चे शिक्षण मुंबई इथे पूर्ण केले. नामांकित वकिलांकडे प्रॅक्टिस केली प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी नियमित जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला त्याचे फळ म्हणून प्रजाक्ता झळके ह्या पहिल्याच परिक्षेत न्यायाधीश बनल्या.

रेशनकार्ड धारकांनी 30 एप्रिल 2025 पर्यंत ईकेवायसी प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी

रेशनकार्ड धारकांची ई केवायसी करण्याची प्रक्रिया शासनाने हाती घेतली असुन ई केवायसी पुर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना ई केवायसी पुर्ण करुन घ्यावी ईकेवायसी करण्यासाठी यापुढे मुदत देण्यात येणार नसुन ज्या कार्डधारकांचे ई केवायसी झालेले नाही अशा कार्डधारकांना मे 2025 नंतर धान्य मिळणार नाही तालुक्यातील 1 लाख 83 हजार कार्डधारकांपैकी 1 लाख 22 हजार कार्डधारकांनी ईकेवायसी पुर्ण केली असुन 61 हजार बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पुर्ण करावी असे आवाहन तहसीलदार गोविंद येरमे यांनी केल आहे.

Pune News Live Updates : क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने पावणेदोन कोटींची फसवणूक

गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे सांगून एक कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डॉ. मोहित मुकेश नागर असे आरोपीचे नाव आहे त्याचा जामीन फेटाळण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत बाणेर येथील ५४ वर्षीय डॉक्टरने चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे

मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेले डॉक्टर आणि आरोपी जयपूरमधील एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिकले होते. त्यामुळे त्यांची जवळची मैत्री झाली होती. आरोपी उपचारासाठी पुण्यात आला होता. त्याने फिर्यादी डॉक्टर आणि त्याच्या इतर मित्रांना डिजिटल चलनात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे सांगून एक कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी डॉ. नागर याने अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com