Maharashtra Live News Update : नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, जिल्ह्याला यलो अलर्ट; शेती पिकांना जीवदान

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ३० जून २०२५, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, जिल्ह्याला यलो अलर्ट; शेती पिकांना जीवदान

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. १५ दिवस पावसाने उघडीत दिली होती. खरिपात पेरणी केलेले पिके पावसाच्या विश्रांतीनंतर धोक्यात आले होते. परंतु आज पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे.

राज्यातील वाहतूकदारांचा संप मागे,

स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा बेमुदत संप अखेर मागे

स्कूलबस ओनर्स असोसिएशन कडून घोषणा

राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा

ट्राफिक विभागाकडून होणाऱ्या बलपूर्वक आणि चुकीच्या ई-चलनांविरोधात उगारले होते बेमुदत संपाचे हत्यार

मुख्यमंत्री आणि परिवहन महामंत्री यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने तूर्तास बेमुदत संप स्थगित

सरकारकडून स्कूलबस चालकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे सरकारकडून ठोस आश्वासन

स्कूल बस चालक संघटना आणि मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्यात लवकरच होणार बैठक

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेती पिकांना जीवदान

नांदेड - हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.पंधरा दिवस पावसाने उघडीत दिली होती. खरिपात पेरणी केलेले पिके पावसाच्या विश्रांतीनंतर धोक्यात आले होते. परंतु आज पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,12 लाख आठ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळात मोठी कारवाई,अवैध शस्त्रसाठा जप्त,दोघांना अटक,रायफल,तलवार,बुलेटप्रूफ जॅकेटसह 350 जिवंत काडतूस जप्त

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,12 लाख आठ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका तरूणाची क्षुल्लक कारणातून हत्या

- नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका तरूणाची क्षुल्लक करणातून खुनाची घटना घडली.

- स्वप्नील गोसावी असे 32 वर्षीय मृतकाच नाव आहे. तो नारा परिसरात राहत होता...

- यात मृतक स्वप्ननिल हा चायनीजच्या टपरीवर जात होता. यावेळी जुन्या वादातून त्या दुचाकीने जताना भुपेश आणि रवींच्या साथीदार यानी त्याला बेदम मारहाण केली..

- यात त्याला जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केला...

- यात भूपेश वंजारी आणि रवी बॅनर्जी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नाव आहे

- जरीपटका पोलिसानी स्वप्निलच्या पत्नीच्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे..

रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष

रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कणकवली पटवर्धन चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सवसाजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती

प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी वरळीत भाजपचा मोठा मेळावा

परभणीत अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस

परभणीत दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खोलंबलेल्या पेरणी होतील व ज्यांनी पेरणी केली आहे त्यांच्या पिकाला दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून परभणीत पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता आणि आज दुपार पासून पावसाला सुरुवात झाली आहे . या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याला आपली पेरलेली पिके वाचतील व ज्यांनी पेरणी केली नाही त्यांना पेरणी करता येईल असा दिलासा मिळालेला आहे.

टिटेघर येथे कृषी दिना निमित्त ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांचा सन्मान

भोर येथील आण्णासाहेब पाटील सभागृहात पंचायत समिती भोर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी म कृषी दिन साजरा करण्यात आला.

भाजप प्रदेशाध्यक्षासाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची निश्चिती

छत्रपती संभाजीनगरात बुरख्यावरून वाद

छत्रपती संभाजीनगरच्या पीइएस कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास मनाई करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून काही तरुणांनी कॉलेजमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचं समोर आले. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यामुळे पुन्हा एकदा हिजाब आणि बुरख्याचा नवा वाद समोर आलाय.

पुणे पालिकेचा बेजबाबदार कारभार उघड

नागरिकांच्या टॅक्सचे पैशाची कशी उधळ पट्टी करायची हे पुणे पालिकेकडून शिकले पाहिजेत. विश्रांतवाडी आळंदि रोड येथील सा.का सचिन भोसले यांनी हा विषय उघडकीस आणला.आधी रस्ता बनवायचा नंतर रस्ता खोदायचा आणि त्याच्यानंतर पाईपलाईन,ड्रेनेजलाइन, केबल टाकायची.आणी पुन्हा नव्याने बजेट टाकून नवीन रस्ता बनवायचा, त्यापेक्षा नागरिकांची मागणी होती की आधी पाईपलाईन टाका नंतर रस्ता बनवा नागरिकांचे टॅक्सच्या पैशाचा असा वापर दुरुपयोग पालिके कडून अपेक्षित नाही.याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे त्याचंच हे उदाहरण.

महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची हत्या; सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचा धक्कादायक खुलासा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे महिला कीर्तनकार ह भ प संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती या घटने दरम्यान मंदिरात चोरी झाल्याचे देखील घटना समोर आली होती.तर या मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात फुटेज समोर आले आहे. या फुटेज मध्ये सदरचे आरोपी हे हिंदी भाषेत बोलत होते त्यांचे अंदाजे वय वीस ते पंचवीस वर्षे असावे. या आरोपी अथवा गॅंग बाबत कोणालाही माहिती असल्यास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा किंवा विरगाव पोलिसांची तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गोराईत हिल व्ह्यू हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात

मुंबईच्या गोराई परिसरात असलेल्या वैराल तलावाजवळील हिल व्ह्यू हॉटेलजवळ आज सकाळी दुचाकीचा अपघात झाला असून, यामध्ये दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे तीनही तरुण सायन कोळीवाडा परिसरात राहणारे असून सहलीसाठी गोराई परिसरात आले होते. तीनही तरुणांनी मद्यप्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती असून दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना तलावा जवळील पाण्यामुळे बाईक घसरून अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की यात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

रेल्वे ट्रेनला धडकून राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू

नाशिकच्या मनमाड जवळील नागरचौकी येथून मजुफ्फरबादला जाणाऱ्या रेल्वे ट्रेनला उडत जाणाऱ्या मोराची धडक बसल्याने मोराचा मृत्यू झाला, गेट जवळ गाडी स्लो झाल्यावर मोरवर लटकताना दिसून आला,आणि खाली पडला. गेट उघडताच परिसरातील काही नागरिकांनी धाव घेत जखमी मोराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात मोराचा मृत्यू झाला.

येवल्यात गोपीचंद पडळकर विरोधात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात नाशिकच्या येवल्यातील ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले आहेत. ख्रिश्चन समाज बांधवांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली  आहे. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.

सोनाईचे प्रमुख प्रवीण माने यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी इंदापूरत राजकीय खेळी खेळली असून पवार कुटुंबाचे निकटवर्तीय आणि एकेकाळी मंत्री भरणेंचे सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम करणारे सोनाई समूहाचे संचालक प्रवीण माने यांना भाजपमध्ये घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि हर्षवर्धन पाटलांना राजकीय दणका दिलाय.उद्या मुंबई येथील भाजपा कार्यालयात मानेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार आहे.

शनिशिंगणापूर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण ; काँग्रेसच्या कामगार विभागाचे देवस्थान परिसरात उपोषण सुरु

गेल्या महिन्यात शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनैश्चर देवस्थानच्या नावाने बनावट अ‍ॅप तयार करून भाविकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल न झाल्याने काँग्रेसच्या कामगार विभागाकडून देवस्थान परिसरात उपोषण सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी देवस्थान प्रशासनाने आणि काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर सायबर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. देवस्थान प्रशासनाने हरीओम एजन्सी (मुंबई), पूजा परिसेवा (कोलकाता), राहु केतू शनीदोष शांती नवग्रह मंदिर (वाराणसी) आणि दिल्ली-गुडगाव येथील संबंधित बनावट अ‍ॅप्सची माहिती सायबर विभागाला दिली होती. मात्र, चौकशीला महिना उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने काँग्रेसच्या कामगार विभागाने देवस्थान परिसरातचं उपोषण सुरु केलं आहे.

सोन्याच्या दुकानात दिवसाढवळ्या दरोडा, दुकानदारावर कोयत्याने वार

पुण्यातून धक्कादायक बातमी

वडगाव बुद्रुक परिसरातील गजानन ज्वेलर्स नावाच्या दुकानावर कोयत्याने वार करत दरोडा...

दिवसाढवळ्या कोयत्याने वार करत दरोडा पडल्याने पुण्यात खळखळ...

दुकानाच्या मालकासह एकजण गंभीर जखमी...

चार दरोडेखोरांनी कोयत्याने वार करत टाकला दरोडा.

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार - कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून, उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

प्रवाशी घेण्यासाठी कार भर रस्त्यात थांबल्याने कारचा अपघात; व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील इरिगेशन कॉलनी येथे महिलाने हात केल्याने कार भर रस्त्यावर थांबल्याने कार चा अपघात झाला असल्याची घटना (ता. ३०) सोमवर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असुन अपघाताचे छायाचित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. त्यावेळी हात करणाऱ्या महिले बरोबर एक पुरुष ही होता. यात कार अचानक भर रस्त्यात मध्यभागी थांबल्याने मागून येणाऱ्या ट्रकने अचानक थांबलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यावेळी कारच्या जवळच प्रवाशी उभे होते. या ट्रकच्या धडकेत कार पंन्नास ते साठ फुट बाजुला फेकली गेली. सुदैवाने प्रवाशी दोघे या अपघातातुन वाचले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Nashik: नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थींचा वापर

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरभरती परीक्षेत पवई केंद्रावर प्रॉक्सीचा वापर करत परीक्षा उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार, आणि आशुतोष कुमार अशी आहेत. कनिष्ठ टेक्निशियन, कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक या पदांसाठी ही परीक्षा झाली होती. १३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ रोजी घेतलेल्या परीक्षेत सात आरोपींनी कटकारस्थान करून परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते.

हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वर शरद पवार गटाचा रास्ता रोको आंदोलन

- महामार्गावरील कानगाव चौरस्ता जवळ असलेल्या उड्डाण पुलावर काल पडला होते मोठे भगदाड

- चार वर्षात सलग दुसऱ्यांदा उडान पुलावर भगदाड पडल्याने शरद पवार गट आक्रमक

- शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

- उड्डाण पुलाच्या कामाची चौकशी करावी,संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षा पहिले केले होते या उड्डाण पुलाचे उद्घाटन,उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर पवार गटाकडून प्रश्नचिन्ह

- पवार गटाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा

- घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दाखल

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अकलूज मध्ये झाले गोल रिंगण....

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज येथे दाखल होताच पहिले गोल रिंगण झाले. अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या मैदानात सर्वप्रथम मानाच्या दोन्ही अश्वांनी धाव घेतली. यानंतर विणेकरी , टाळकरी व डोक्यावर तुळस घेतलेल्या महिलांची धाव झाली. अकलूजच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांच्या उडीचा खेळही यानिमित्ताने रंगला. तुकाराम तुकाराम आणि हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा संपन्न झाला.. यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज मुक्कामी असणार आहे. तर उद्या माळीनगर मार्गे बोरगाव येथे मुक्काम असणार आहे.

Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा तसेच बर्दापूर फाटा या ठिकाणी किसान सभा व शेतकरी संघटना यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

वृद्ध व्यक्तीच्या झालेल्या निर्घुण हत्येने शिरपूर हादरले

मारेकऱ्याने वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या

हत्या करून मारेकरी घटनास्थळावरून झाला पसार

गोपाल सिंग परदेसी असे मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव

विविध तपास यंत्रणांसह थाळनेर पोलीस घटनास्थळी दाखल

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी पोहोचून केली पाहणी

हत्तेचे कारण अद्याप अस्पष्ट तर हत्त्येची बातमी गावात पसरताच गावात उडाली खळबळ

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई

आज विधानसभेत गदारोळ झाला. त्यानंतर नाना पटोलो राहुल नार्वेकरांसमोर उभे होते. त्यानंतर आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली आहे.

शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली- कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू...

- शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे,अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर हा रस्ता रोको सुरू झाला आहे.महिलांसह मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,अशी भूमिका घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून सांगली-कोल्हापूर बरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

Dhule: धुळ्यात काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरेंच्या सेनेत देखील खिंडार

धुळे शहर विधानसभा संघटक ललित माळी, आणि युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश माळी यांनी पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला पक्षाचा राजीनामा

काँग्रेस पाठोपाठ आता धुळ्यातील ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील मुंबईत भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश

धुळ्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला ठोकला रामराम

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत शिवसेनेतून मुक्त होण्याचे पत्रक केले व्हायरल...

मुंबईत भाजप कार्यालयामध्ये आज होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह करणार भाजपात पक्षप्रवेश

Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेच्या दालनात 102 रुग्णवाहिका चालकांचे ठिय्या आंदोलन

जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेवरील 90 पेक्षा अधिक चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. जिल्हा परिषदेच्या दालनात ठिय्या देत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यामुळे काही काळ जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांचा रस्ताही बंद झाला होता.

"आम्ही गेल्या आठ ते दहा वर्षांपासून 102 रुग्णवाहिकेवर सातत्याने काम करत आहोत. मात्र अजूनही आम्हाला कोणतीही कायमस्वरूपी नोकरी नाही, ना शासकीय सेवेसारखी वेतन-भत्त्याची हमी.""आम्ही कोणत्याही प्रकारच्या ठेकेदारी पद्धतीत काम करणार नाही. आम्हाला न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच वेतन मिळाले पाहिजे.

गुणरत्न सदावर्ते यांना कानाखाली मारणाऱ्याला शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर

हिंदी सक्ती विरोधात मराठी माणसाचा विजय झाला आहे मात्र कुरळ्या केसाचा (कुत्रा) गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात बोलत आहे या माणसाला जो कानाखाली वाजवेल त्याला सायन कोळीवाडा मधील शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक प्रशांत भिसे यांच्या कडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे

आंबोली घाटात कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल

आंबोलीतील धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कर्नाटकातील काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना एका व्हायरल व्हिडिओ दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणे, जोरात आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार करताना हे पर्यटक दिसत आहेत. या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

परभणी मध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

आज शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सुरुवात होणार आहे आणि याच मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे आज शक्तीपीठ महामार्गाला मोजण्यासाठी अधिकारी येणार आहेत आणि याच अधिकाऱ्यांना आमच्या जमिनी एक इंच ही देणार नाही व आम्ही मोजू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची भूमिका आहे यामुळे शेतकरी आज मोठ्या संख्येने जमून आंदोलन करत आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाड्या उभारून आम्ही आमच्या शेताकडे अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे

भाईंदरमधील निर्घृण खुन प्रकरणातील आरोपी १३ वर्षांनंतर दिल्लीतून अटकेत

भाईंदर पूर्वेत २०१२ साली एका व्यक्तीचा अत्यंत निर्घृण खून झाला होता. गळा आवळून, डोक्यात लोखंडी दांड्याने मारहाण करून, धारदार शस्त्रांनी वार करत खून करण्यात आला होता.

या प्रकरणातला आरोपी तब्बल १३ वर्ष फरार होता. काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष १ ने अचूक माहितीवरून आणि कौशल्यपूर्ण तपासातून आरोपी गोविंद कुमार याला दिल्लीतून अटक केली आहे. तो गेली अनेक वर्षे दिल्ली व बिहारमध्ये आपली ओळख लपवत राहात होता.

आता आरोपीला नवघर पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या कृषी दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आंदोलन करणाऱ्या 15 प्रमुख नेत्यांना पोलिसांच्या नोटीस

पुणे - बेंगलोर महामार्गावरील आंदोलन ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू

आंदोलन दरम्यान आंदोलकांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

आंदोलकांनी शांततेत आंदोलन करण्याचं पोलिसांचं आवाहन

कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची माहिती

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे तिसरे गोल रिंगण काही वेळात पार पडणार

अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालय मैदानावर पार पडणार रिंगण

आज संत तुकाराम महाराजाच्या पालखीचा मुक्काम अकलूजमध्ये

मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं होतं. त्यांच्या निधनानं शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

फिटनेससाठी अभिनेता मिलींद सोमणचा मुंबई गोवा सायकल प्रवास

फिटनेस उत्साही अभिनेता मिलींद सोमण यांची आरोग्य आणि फिटनेससाठीसाठी सायकलद्वारे जनजागृती पहायला मिळतेय. अभिनेता मिलिंद सोमण सध्या सायकलवरून कोकणात पहायला मिळतायत. मुंबई ते गोवा असा प्रवास चार दिवसांपासून सुरु झालाय. गोव्याकडे रवाना होताना त्यांचा लांजामधील व्हिडिओ समोर आलाय. भारतीय लोकांनी फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सायकलचा प्रवास करुन जनजागृती करण्याचा त्यांचा हाच उद्देश आहे.दररोज ११० किमी चा सायकल प्रवास न थकता केला जातो आहे. वयाच्या ६० व्या वर्षी मिलिंद सोमण यांनी सुद्धा फिटनेस ठेवला आहे.

आजपासून व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बंद

मान्सून दाखल झाल्यानं आजपासून राज्यातील विविध भागातील व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो आणि याकाळात वन्य प्राण्यांना पर्यटकांकडून कुठलाही त्रास पोहचू नये याची खबरदारी म्हणून या जंगल सफरीला बंद करण्याला प्राधान्य देण्यात येतं.

राष्ट्रवादीतील एका पक्ष प्रवेशाने रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत घमासान

रत्नागिरी- राष्ट्रवादीतील एका पक्ष प्रवेशाने रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत घमासान

अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेकडून राजकीय डावपेच

राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना काटशह देण्यासाठी शिवसेनेकडून व्युह रचना

रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय खेळीची चर्चा

शेखर निकम यांच्या विरोधात विधानसभा लढलेले प्रशांत यादव यांच्याशी शिवसेना साधते जवळीक

अजित यशवंतराव यांच्या मुंबईतील प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमच्यावर टिका करणाऱ्यांना आमच्याशी समन्वय न साधता पक्ष प्रवेशावर घेतला आक्षेप

तर विधानसभेला खालच्या शब्दात सदभावना करणारे नेते, परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकांच्या सोबत आलेत

त्यामुळे कुणी कुणाला साधन सुचिता सांगावी हा प्रश्न असं सांगत थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सामंत यांचे टोचले कान

राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले

शक्तीपीठ महामार्ग विरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस

आज शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन

जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे .राजेश अनावडे, वय वर्ष 40,

राहणार संभाजीनगर अस मयत व्यक्तीच नाव असून ते छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयातील एका वकिलाकडे क्लार्क म्हणून काम करत होते. काल अनावडे हे छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंबड चौफुली ते छत्रपती संभाजीनगर चौफुली रस्तावर ट्रकने धडक दिली या धडकेत त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.दरम्यान दुचाकीस्वाराला धडक देणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे..

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकरी हित जोपासत संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये शेतकऱ्यांकरिता संपूर्ण कर्जमाफीचा ठराव घेतला. समितीचे सभापती मनोज वसू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी संदर्भात प्रस्ताव मांडला तर उपसभापती संजय कामनापुरे यांनी त्याला अनुमोदन देत सर्व सदस्यांनी एकमताने कर्जमाफीचा ठराव मंजूर केलाय.बैठकीनंतर सर्व संचालकांनी पुलगावच्या अप्पर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना बाजार समितीच्या ठरावाची प्रत व निवेदन सादर केले.

भंडाऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत देव्हाडी व सुकळी शिवारात देव्हाडी बाजार परिसरातून बुलेट मोटरसायकल व सुकळी शेत शिवारातून महत्त्वाची शेती अवजारे चोरीला गेल्याच्या घटनांनी नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा आता घराबाहेर व शेतातील मौल्यवान साहित्यावर डोळा ठेवल्याचे दिसून येत आहे.सुकळी शिवारातील रतिराम बसिने यांच्या शेतातून मध्यरात्रीच्या सुमारास शेतीची अवजारे कॅज्युअल, दतारी, रोटा वेंटर चोरीला गेली. तसेच देव्हाडी येथील बाजार परिसरातून पिंटू शहारे यांची बुलेट मोटरसायकल चोरीला गेली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाली आहे. या घटनांमुळे शहारे व बसीने यांना आर्थिक फटका बसला आहे.तर चोरीला गेलेल्या अवजारांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकाम सुरू झाले असताना अवजारे चोरीला गेल्याने नांगरणी, बियाणे पेरणी आणि सिंचनाचे कशी करावी असा प्रश्न संबंधित शेतकऱ्याने केला आहे.

तिकीट आरक्षण यादी आता आठ तास आधी,   रेल्वेच्या ‘तत्काळ’ आरक्षणासाठी ‘आधार’ अनिवार्य

भारतीय रेल्वे प्रवास आजपासून (१ जुलै) महागला असला, तरी प्रवाशांच्या आरक्षणाबाबत शेवटच्या क्षणापर्यंतची अनिश्चितता दूर करण्यासाठी आता चार तासांऐवजी आठ तास अगोदर तिकीट आरक्षण यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ‘तत्काळ आरक्षण’ सुविधेचा लाभ गरज असलेल्या प्रवाशालाच मिळावा म्हणून ‘आधार’ क्रमांक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

रेल्वे बोर्डाने ‘प्रवासी आरक्षण प्रणाली’त आठवडाभरापूर्वी बदल सुचविले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदलांना संमती दर्शवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. आजपासून (१ जुलै) याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने आता गाडी निघण्यापूर्वी आठ तास अगोदर तिकीट आरक्षणाची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

स्व:ताच्या 9 वर्षीय मुलीस कुर्‍हाडीने घाव घालत खुन करणाऱ्या निर्दयी बापास तीन दिवसाची पोलिस

धाराशिव - स्व:ताच्या 9 वर्षीय मुलीस कुर्‍हाडीने घाव घालत तिचा खुन करणाऱ्या निर्दयी बापास परंडा तालुक्यातील आंबी पोलिसांनी ताब्यात घेवुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन आरोपी बापाने पोलीसांकडे गुन्हा देखील कबुल केला आहे.परंडा तालुक्यातील आंबी पोलिस ठाणे हद्दीतील माणिकनगर येथील आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने रवीवारी पहाटे त्याची 9 वर्षीय मुलगी गौरी हिच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालत खुन केला होता दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बापाला ताब्यात घेतले तर मुलगी सतत आजारी पडत असुन सायकलहुन पडल्याने रागाच्या भरात तिचा खुन केल्याचे सांगितले या प्रकरणी आंबी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलकांना पोलिसांची नोटीस

कोल्हापूरमधील बी एन एस एस कलम 168 प्रमाणे पोलिसांनी आंदोलकांना बजावल्या नोटीसा

कोल्हापुरातील सुमारे 15 प्रमुख आंदोलकांना बजावल्या नोटीसा

जिल्ह्यात बंदी आदेश असल्याने शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन स्थगित करण्याचं नोटिशीद्वारे पोलिसांचा आंदोलकांना आवाहन

नाशिकमधून सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

- यंदा मे महिन्यात प्रवाशांच्या संख्येत ४२ टक्क्यांची वाढ

- मे महिन्यात नाशिक विमानतळावरून ३७,५०९ प्रवाशांनी केला विमान प्रवास

- मागील वर्षाच्या तुलनेत ४२ टक्के अधिक प्रवासी

- नाशिक विमानतळावरून सध्या हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, गोवा यासह अन्य शहरात सुरू आहे विमानसेवा

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा होणार आणखी विस्तार

- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानसेवेला आणखी उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता

वाडी पोलिसांच्या सतर्कतेने आत्महत्या करण्यास वाचवण्यात पोलिसांना यश

- व्यवसायात नुकसान झाल्यानंतर कर्जबाजारीतून तणावात असलेल्या एका तरुण व्यवसायिकाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला...

- आत्महत्या करण्यासाठी मौदा तालुक्यातील नदीकाठी पोहोचून आईला फोन करून हा माझा शेवटचा फोन आहे असे सांगितले. या फोन नंतर आईने याची माहिती पोलिसांना दिली.

- पोलिसांनी तात्काळ मोबाईल लोकेशन शोधून त्या तरुणाचा जीव वाचविला आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल. त्यांच्या घरच्याला सुपूर्द केले.

- संबंधित व्यवसायिकाचा वाडी परिसरात कारखाना असून त्याने काही महिन्या अगोदर जेसीबी खरेदी केल्या होत्या...हवा तसा मोबदला मिळत नसल्याने व्यवसायात नुकसान झाले..कर्जबाजारी झाल्यानंतर अखेर आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती.

३५ ग्रॅम हेरॉईनसह दोन पंजाबींना पनवेलमध्ये अटक

पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा ३५ ग्रॅम हेरॉईनसह दोन पंजाबमधील व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २९ जून २०२५ रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५ चे कलम ८(सी), २२(बी) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली आहेत.

वारीत लोकरी घोंगड्यांना मागणी असते. लोकरी पासून तयार करण्यात आलेल्या घोंगड्याना चांगली मागणी असते. दिवाळीला विठुरायाला घोंगड्याचा पोशाख केला जातो. त्यामुळे भाविक घोंगडी खरेदी करतात. पांढरे,काळे पट्टयाचे अशा प्रकारची घोंगडी बाजारात विक्रीसाठी आली आहेत. पाचशे रूपया पासून ते दोन‌ हजार रूपयांपर्यत घोंगडी विकली‌ जात आहे. हातावर विणलेली घोंगडीची किंमत अधिक आहे. येथील घोंगडे गल्लीतील घोंगडीची दुकाने सजली आहेत.

येरमाळा येथील मुकबधीर चित्रकार रविशंकर बारसकर यांनी साकारली विठ्ठलाची पेंटींग प्रतिमा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथील मुकबधीर चित्रकार रविशंकर बारसकर यांनी आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठलाची पेंटिग प्रतिमा कलाकृती साकारली आहे.ही प्रतिमा 14 ×17 इंच असुन वेगवेगळ्या रंगीत कलरचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.यासाठी दोन तासाचा कालावधीत लागला असुन ही पेंटिंग अत्यंत आकर्षक व अतिशय सुंदर आहे.

माथेरान वाहन पार्किंगमध्ये झाड पडून वाहनांचे नुकसान

माथेरान दस्तुरी नाक्यावरील वाहन पार्किंग मध्ये वाऱ्याच्या वेगाने झाड उन्मळून पडल्याने खाजगी दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.दस्तुरी नाक्यावर असणारी पार्किंग व्यवस्था पूर्णपणे जंगलाने व्यापलेली आहे.त्यामुळेच सुट्ट्यांच्या हंगामात ऐन गर्दीच्या वेळी जागेअभावी झाडांच्या आडोशाला मोटार वाहने पार्क करावी लागतात. काही दिवसांपूर्वी येथील स्थानिकांच्या वाहनांवर अशाप्रकारे झाड उन्मळून पडल्याने एकूण तीन वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. याकामी वनव्यवस्थापन समितीने येथील पार्किंग व्यवस्था बोरीचे मैदान याभागात बहुमजली वाहन पार्किंग व्यवस्था केल्यास पावसाळ्यात वाहनांचे नुकसान होणार नाही आणि पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे होऊ शकते असे वाहन चालक-मालक बोलत आहेत.

भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्याना अटक केलीय.. त्यांच्याकडुन 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.. अकोल्यातल्या खदान, जुने शहर आणि तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये या दोन्ही चोरट्यांनी भर दिवसा चोरी करत लाखो रुपये लंपास केले होते. आकाश प्रकाश पवार आणि उमेश गटरंग पवार असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.. पोलिसांनी चोरट्यांकडून 15 ग्रॅम सोने तसेच 20 ग्रॅम चांदी असा एकत्रित 1 लाख 37 रुपयांचा इतका मुद्देमाल जप्त केलाय.

जालन्यातील मानेगाव येथील शेतकऱ्यांचे जालना तहसील कार्यालय समोर आंदोलन

जालन्यातील मानेगाव येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी या मागणीसाठी जालना तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल. मागील वर्षी मानेगाव जहागीर शिवारातील पाझर तलाव फुटला आणि या तलावाचे पाणी 53 शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने या शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे देखील केले मात्र एक वर्ष उलटून देखील अद्यापही या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी काल शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल आहे.

प्लास्टिक मुक्त तळेगाव साठी नगरपरिषदने काढले रॅली

प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे यासाठी शहरासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदच्या वतीने माझी वसुंधरा अंतर्गत प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे जनजागृती रॅली काढण्यात आली...या रॅलीची सुरुवात तळेगाव नगरपरिषद पासून सुरू झाली असून रणजीत सिंग दाभाडे नगर, भेगडे तालीम चौक, जिजामाता चौक, मारुती चौक मार्गे नगरपरिषद जवळ विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये. नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी, नागरिकांनी समाविष्ट होऊन जनजागृती रॅली उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. दरम्यान रॅलीमध्ये प्रत्येक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती वरची पथनाट्यही सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये प्लास्टिक मुक्ती बाबत विविध प्रकारचे घोषवाक्य घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते... शेवटी उप मुख्याधिकारी ममता राठोड यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली.

दापोलीत आढळला मस्क्ड बुबी दुर्मिळ पक्षी

दापोलीतील आंजर्ले मुर्डी समुद्रकिनाऱ्यावर मास्क्ड बुबी हा दूर्मिळ पक्षी सापडलाय.. मनित बाईत, प्रतीक बाईत या दोघांनी या पक्षाला जीवदान दिलेय.या पक्षाला मास्क्ड बुबी (masked booby) अर्थातच मुखवटाधारी बुबी किंवा मोठा समुद्री कावळा म्हणतात. आंजर्ले मुर्डी गावातील स्थानिक शेतकरी वैभव झगडे यांनी आपल्या शेतात या पक्ष्याला थकलेल्या अवस्थेत पाहिले. तो हालचाल करू शकत नव्हता, पंख पूर्णपणे ओले झालेले होते आणि तो अत्यंत कमकुवत दिसत होता. वाईल्ड अँनिमल रेस्क्युअर संस्थेच्या मनीत आणि प्रतीक यांनी या पक्षावर उपचार करुन जीवनदान दिले.

Maharashtra Live News Update : ताडोबा पर्यटन आजपासून तीन महिने बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर क्षेत्र आजपासून पुढील तीन महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे. वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला हा प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात तीन महिन्यांकरिता बंद केला जातो. पावसाळ्यात जंगलातील रस्ते वाहनांसाठी गैरसोयीचे होतात. त्यामुळे हा निर्णय दरवर्षी घेतला जातो. ही बंदी केवळ कोअरझोनमधील पर्यटनासाठी असून बफर क्षेत्रातील पर्यटन मात्र सुरूच राहणार आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये, हाही यामागील एक हेतू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com