राज्यात मान्सून (Monsoon) दाखल होऊन बरेच दिवस झाले पण अजून म्हणावा तसा पाऊस राज्यात पडला नाही. सध्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम आणि हलका पाऊस पडत आहे. पण आता पाऊस चांगला जोर धरणार असून मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे. अशामध्ये पुढचे चार दिवस कोकणसाह राज्यातील इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल.' राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावली. मुंबईच्या तुलनेत मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक होता.
मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे. रविवारी म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. तर मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, शनिवारी मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचले होते. तर पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाला होता. लोकलसेवा २५ ते ३० मिनिटं उशिराने सुरू होती. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.