राज्यात मान्सूनचा जोर दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असली, तरी अद्याप समाधानकारक स्थिती निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आल्याचे समोर आले आहे. जलसंपदा विभागाच्या ४ जुलै २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील ३,०२८ मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सध्या एकूण १०,४४३.५९ दशलक्ष घनमीटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या केवळ २५.५६ टक्के इतकाच आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये तब्बल ४९.७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केला असता, यंदा पुणे विभागाची स्थिती सर्वात बिकट आणि चिंताजनक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ १६.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे, अमरावती विभागात सध्या राज्यातील सर्वाधिक म्हणजे ४१.०४ टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल नागपूर विभागात ३९.०७ टक्के साठा उपलब्ध आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ३२.५२ टक्के, नाशिक विभागात २५.४६ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात २४.७६ टक्के साठा नोंदवला गेला आहे.
राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांचा (धरणांचा) विचार केला असता, तिथे सध्या केवळ २४.९० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी मोठ्या धरणांमध्ये हाच साठा ५२.८४ टक्के इतका समाधानकारक होता. याशिवाय, मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ३३.१४ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये २१.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मान्सूनने जरी राज्यभर दमदार सुरुवात केली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश विभागांमध्ये पाणीसाठा कमालीचा कमी आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाच्या सातत्यावर आणि तीव्रतेवरच राज्याच्या जलस्थितीचे आणि पाणीटंचाईचे चित्र अवलंबून राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.