

जालना–जळगाव रेल्वे मार्गासाठी ५,८०४ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद.
१७४ किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार.
एकूण १७ नवीन स्थानकांची निर्मिती होणार.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला कमी अंतरात थेट जोडणाऱ्या जळगाव–जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामांना आता गती मिळू लागली आहे. रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ५ हजार ८०४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार असल्याचे चित्र आहे. भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पुढील वर्षभरात १७४ किलोमीटरच्या या मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांतून त्याला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
१७४ किलोमीटरपैकी जवळपास १४० किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून जाणार आहे. तर उर्वरित ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये थेट रेल्वे संपर्क निर्माण होईल. सध्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यादरम्यान रेल्वेने प्रवास करताना मोठा वळसा घ्यावा लागतो. नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यासोबतच या रेल्वे मार्गामुळे माल वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल.
हा रेल्वेमार्ग जालना, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यांतून जाणार आहे. जालना–बदनापूर तालुक्यांतील ९ गावांमधील १४६ हेक्टर, तर भोकरदन तालुक्यातील १६ गावांमधील १८० ते २०० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालीय. दरम्यान जळगाव तालुक्यातील तरसोद, पिंपळे, कुसुंबा, आसोदा, देव्हारी, धानवड, मन्यारखेडा तसेच जळगाव बुद्रुक परिसरातील एकूण सुमारे ८६.६९ हेक्टर शेतजमिनींचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघांतून हा मार्ग जातो. जालना उपविभागातील नागेवाडी, तुपेवाडी, देऊळगाव, मानदेऊळगाव, नजीक पांगरी, मांडवा, खादगाव, दावलवाडी तसेच भोकरदन तालुक्यातील गारखेडा, बेलोरा, क्षीरसागर, नांजा, सोयगाव देवी, तपोवन, वालसा खालसा, चांदई ठोंबरी, देऊळगाव ताड, बोरगाव तारू, मुठाड, राजूर, चांदई टेपली, चिंचोली, जोमाळ या गावांतून हा मार्ग जाईल. हा रेल्वे मार्ग जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा हा असणार आहे. अजिंठा लेणी, तीर्थक्षेत्र राजूरेश्वर गणपती मंदिरासह मराठवाड्याला थेट मुंबई-दिल्ली-कोलकाता या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.