
राज्यभरात मुसळधार पावसाचा कहर सुरू
सोलापूरात अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते पाण्याखाली
चादसैली घाटात दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरीसाठी इशारा दिला
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं राज्यात जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यातील पावसाने हाहाकार माजवलाय. हवामान विभागाने, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आज दिवसभर खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण ओडिशा तसेच उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय.
यामुळे पुढील पाच दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान कालपासून सुरू झालेल्या तुफान पावसाने सोलापुरात कहर घातलाय. दक्षिण सोलापूरातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तर सातपुड्याच्या चादसैली घाटात दरड कोसळली आहे. रिमझिम पावसामुळे घाट वळण रस्त्यावर दरड कोसळली आहे.
जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार गावात आणि परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाच स्वरूप आलंय. खरिपातील कपाशी आणि सोयाबीन पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसणार आहे. जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकाची अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून,मागील एका तासापासून सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा परिसरात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असून, घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या शेतजमिनींमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद या खरीप पिकांना फटका बसण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आधीच अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूरसह बीड धाराशिव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरण 90 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक पाहता , मांजरा धरणाचे 18 दरवाजांपैकी सध्या 4 दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाचे पाणी शहरातील व्यावसायिक दुकानात घुसले. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील व्यावसायिक दुकानांत पाणी शिरले.
नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका किनवट चालू केला बसला आहे. किनवट तालुक्यातील गणेशपुर हे गाव पाण्याखाली गेला आहे. गणेश पुर गावच्यावर असलेल्या लोणी तलावाच्या कालव्याचे पाणी गावात शिरल्याने गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावातील अनेक घर पाण्याखाली गेल्याने घरातील संसार उपयोगी साहित्यांचा मोठं नुकसान झालं आहे. या गावापर्यंत प्रशासन पोहोचलं नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे.आज सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढला असून नांदेडच्या हिमायतनगर,किनवट तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे.दरम्यान पुराच्या पाण्यात स्कूलबस वाहून गेल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी येथे ही घटना घडली. विद्यार्थ्यांना बोधडी येथील शाळेत सोडून येत असताना बोधडी ते सिंदगी रस्त्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने स्कूलबस सह चालक वाहून गेल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या चालकाचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.