
राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे २,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता पुणे कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात अवकाळी पावासाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या केळीबहुल भागाला बसला. वादळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेले दिवस दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केळी, पपई, त्याचबरोबर हरभरा, गहू आणि कांदा पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्याचबरोबर संबंधित कृषी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील आमदार काशीराम पावरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासन स्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील आमदार काशीराम पावरा यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. ऐन हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल आणि जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचे नुकसान झाले.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल परिसरात झालेल्या पावसामुळे विजय पैठणकर या शेतकऱ्यांचे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत आहेत. ३ वर्षात शेतकऱ्यांचं १८० कोटीचं नुकसान झाले आहे. २ वर्षांपासून ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. बागायती, जिरायती आणि फळ पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हाता तोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जात आहे. द्राक्ष घडकुजणे रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने द्राक्ष शेती केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलते हवामान यामुळे या द्राक्ष पिकाला फटका बसत आहे. गेल्या काही दिवस धुके पडल्याने द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. तर त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव तर झालाच मात्र फळबागांना देखील याचा मोठा फटका बसलाय. तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागा आहेत. मात्र याला देखील ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसला आहे. त्यातच महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पुरेसे पाणी न मिळाल्याने तीन एकर क्षेत्रावरील खरबूज मातीमोल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करुनही उत्पन्न घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.