

रायगडमध्ये शाळांना सुट्टी असल्याचे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल
जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे स्पष्ट केले की सर्व शाळा नियमित सुरू आहे
फेक पत्रामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम
प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले
रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. या पावसामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सही आणि शिक्क्यासह शाळांना सुट्टी जाहीर करण्यात असल्याचे खोटे पत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकामुळे पालकांसह शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पण आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून 'शाळा नियमित सुरू' असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असलेले रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची सही असलेले फेक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐन पावसाळ्याच्या आणि संभाव्य आपत्तीच्या काळात अशा प्रकारे खोटे पत्र व्हायरल झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या खोट्या पत्रकामुळे गोंधळ उडाला असून विद्यार्थी शाळेत जात नाही आहेत. हे पत्रक काहींनी आपल्या सोशल मीडियावर आणि काहींनी स्टेट्सवर ठेवले होते. मोठ्या प्रमाणात हे पत्रक व्हायरल झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावरील विविध व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या नावाने काढलेले एक पत्र व्हायरल होत होते. यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ८ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचे नमूद करण्यात आले होते. पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची हुबेहूब सही आणि शिक्काही वापरण्यात आला होता. हे पत्र पाहताच अनेकांचा गोंधळ उडाला. अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही या विवंचनेत पडले. तर बहुतांश मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही नक्की सुट्टी आहे की नाही, हे समजत नव्हते. काही तर या पत्रकावर विश्वास ठेवत मुलांना शाळेत पाठवलेच नाही.
अखेर सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास 'रायगड आपत्ती नियंत्रण कक्षा'च्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलवरून एक स्पष्टीकरण जारी करण्यात आले. या स्पष्टीकरणात रायगड जिल्ह्यातील शाळांना आज कोणतीही सुट्टी नसून सर्व शाळा नियमित सुरू आहेत, असा मेसेज व्हायरल करण्यात आला. या खुलाशानंतर कुठेतरी या गोंधळावर पडदा पडला. तसंच, अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकार कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अशा फेक न्यूज आणि बनावट पत्रे तयार करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन सायबर पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता रायगड जिल्ह्यातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.