खरात प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे, कुणालाच सोडणार नाही; फडणवीसांचा विरोधकांनाही इशारा, वाचा नेमकं काय म्हणाले...
Devendra Fadnavis statement on Ashok Kharat case latest update : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली जात आहे. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. "खरात याचा भंडाफोड आम्हीच केला," असे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास कसा आणि कुठपर्यंत आला, यावरही त्यांनी भाष्य केले. विरोधकांना टोला लगावताना "हवेत बोलण्यात अर्थ नाही," असे ते म्हणाले. खरात प्रकरणावर देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले, त्याबाबत जाणून घेऊयात...
"हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. अशोक खरात याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भंडाफोड केला आहे. आता हळूहळू पीडितांना धीर देऊन समोर आणणे सुरू आहे. त्यात आता काही महिला प्रतिसाद देत आहेत. या संपूर्ण प्रकाराचे वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. "एसआयटी (SIT) तयार केली आहे; नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत," असेही त्यांनी सांगितले.
अशोक खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. "या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणाकडे काही पुरावा असेल तर तो त्यांनी आणून द्यावा, त्यावरही कारवाई होईल. पण केवळ राजकीय रंग देऊ नये. विरोधी पक्षाचे कोण कोण गेले, याचे पुरावे मी देऊ शकतो; याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत आणि ते पोलिसांचे काम आहे, माझे नाही," असे फडणवीस म्हणाले.
"अशोक खरात यांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचा सहभाग (Involvement) असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण केवळ भेटले म्हणून कारवाई करायला लागलो, तर मग तुम्हाला माहिती आहे कोण कोण, काय काय आणि कसे कसे करायचे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. "आऊट ऑफ टर्न त्यांना पाणी कोणी दिले? ४० किलोमीटरची पाईपलाईन कोणी टाकली? हे सगळे तुम्ही दाखवले आहे. त्यामुळे राजकारण करू नये, हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे," असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
"आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढणे, यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काहीही झाले तरी त्यांना याची शिक्षा भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस यासाठी जे करावे लागेल, ते करायला तयार आहेत," असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. "कोण कोणाला भेटले, कोणासोबत फोटो आहेत, या गोष्टी वेगळ्या असतात; कोणाचेही कोणासोबत फोटो असू शकतात. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून ४० किलोमीटर दुरून पाणी दिले, त्यांना काय शिक्षा द्यायची?" असा थेट सवाल त्यांनी ठाकरे गटाला केला.
"मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तोंडाला का कुलूप लागले आहे? सिलेक्टिव्ह का बोलतात? त्यामुळे काहींना केवळ राजकारण करायचे आहे. आम्हाला महिलांच्या प्रतिष्ठेमध्ये (Dignity) रस आहे. महिलांसोबत ज्यांनी दुर्व्यवहार केला आहे, त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. "पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची की नाही ते नंतर पाहू, पण पहिली चौकशी महिलांच्या संदर्भातील आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
