

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार
फडणवीसांनी मोदींची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांदरम्यान फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्रीय मंत्रिपदाबाबत सुचक वक्तव्य केलंय. तसेच राज्यात सुरू असलेल्या सर्व चर्चांना फेटाळून लावलंय.
केंद्राच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा फेटाळून लावताना मुख्यमंत्री फेडणवीसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनता आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवलीय. ते ही जबाबदारी पार पाडणे सुरूच ठेवणार आहेत.
केंद्रात वर्णी लागण्याच्या चर्चांवर बोलताना फडणवीस म्हणाले, मी दिल्लीत राहो किंवा मुंबईत, लोक सतत तर्क-वितर्क काढत असतात. मला वाटते की अनेक लोकांकडे दुसरे काही कामच नाही, त्यामुळे माझ्याबद्दल चर्चा करण्यात त्यांना मजा येते. त्यांना ती मजा घेऊ द्या." त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातील जनता आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ते राज्याची सेवा करत राहतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे यशस्वी नेते आहेत. जागतिक स्तरावर भारताची नवी ओळख निर्माण करण्यासाठी ते कार्यरत आहेत. पंतप्रधानांशी झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आणि मार्गदर्शक होती."
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील विविध विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या योजना व प्रकल्पांवर चर्चा केली. नेहमीप्रमाणेच ही भेट अत्यंत उत्साहवर्धक होती. विकासाशी संबंधित बाबींवर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला मिळणारा त्यांचा भक्कम पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतो. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी असल्याचं फडणवीस म्हणालेत.
या बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, कृषी, उद्योग, परिवहन आणि इतर जनहितार्थ योजनांशी संबंधित विषयांवरही चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांमधील उत्तम समन्वयामुळे महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि राज्यातील नागरिकांना त्याचे व्यापक लाभ मिळतील, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.