मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कमी झालेली कोरोना (Corona) रुग्णसंख्या आता हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाचे 500 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील मुंबईत (Mumbai) 300 हून अधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कोरोना रुग्णसंख्येबाबत गंभीर इशारा दिला आहे. (Corona Virus Latest News In Maharastra)
नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी जनतेला केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, "सर्वांच्याच लक्षात आलं असेल की कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काल थोडी चर्चा झाली. कोरोना बाधितांची संख्या वाढणं हे काळजी करण्यासारखं वातावरण आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या जर वाढत गेली तर नंतर कशा प्रकारे हाताबाहेर जाते हे पहिल्या लाटेत, दुसऱ्या लाटेत सर्वांनी पाहिलं आहे".
"आम्ही, सार्वजनिक आरोग्य विभाग, टास्क फोर्स, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या वाढली तर कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा", असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात दिवसागणिक आढळून येणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात कोरोनाची चौथी लाट येतेय की काय अशी भीती आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे तब्बल 1081 रुग्ण आढळून आले होते. चिंताजनक बाब म्हणजे यातील 739 रुग्ण हे एकट्या मुंबईतील होते. राज्याची रुग्णसंख्या तीन दिवसांत दुप्पट झाली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या 4032 इतकी आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,36,275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.