Congress Vs BJP Over Onion procurement rate
Congress Vs BJP Over Onion procurement rate SAAM TV

Congress Protest : ...तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील; कांदाप्रश्नी केंद्रातील भाजप सरकारला काँग्रेसचा 'आरपार'चा इशारा

Congress Vs BJP Over Onion procurement rate | भाजप सरकार जर अन्नदात्याच्या भावना समजत नसेल, तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष आरपारचा लढा देईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
Published on

Congress Protest Against onion procurement rate : शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही, एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेडमार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? असा संतप्त सवाल करत भाजप सरकार जर अन्नदात्याच्या भावना समजत नसेल, तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष आरपारचा लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पुणे जिल्ह्यातील चाकण येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने कांद्याचे निर्यातशुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसत आहे. ज्या भागात कांदा पिकतो त्या सर्व भागातील बाजारपेठा व लिलाव बंद आहेत. मोदी सरकारविरोधात सर्वत्र उद्रेक सुरू झाला आहे. मागील दीड महिन्यात १८ लाख टन कांदा बाजारात आला आहे. नाफेड फक्त २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. मग उर्वरित कांद्याचे काय करायचे ? याचे उत्तर सरकारने द्यावे.

Congress Vs BJP Over Onion procurement rate
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवापूर्वीच मुंबईतील रस्ते होणार चकाचक, BMC चा जम्बो प्लान

खरे तर कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडून निर्यात शुल्क रद्द करवून घ्यायला हवे होते; पण नरेंद्र मोदींच्या समोर बोलण्याची यांची हिंमतच नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव सोबत आहे. कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरुच राहील, असा इशाराही पटोले यांनी दिला.

भाजप सत्तेत आला तर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करू. तसेच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर करू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली यवतमाळ येथे दिले होते. सत्तेत येताच मोदींनी शब्द फिरवला, स्वामीनाथ समितीच्या शिफारशी लागू करू शकत नाही असे सुप्रीम कोर्टात सांगितले आणि शेतकरी कर्जमाफी हा निवडणुकीतील जुमला होता असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Congress Vs BJP Over Onion procurement rate
Maharashtra Politics: 'शरद पवारांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं?' राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

मोदींचे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. तीन काळे कायदे आणून शेतकऱ्याला गुलाम करायचे होते. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. आंदोलनजीवी, खलिस्तानी म्हणून शेतकऱ्यांचा अपमान केला. शेतमालाला भाव मिळू द्यायचा नाही हे मोदी सरकारचे धोरण आहे, असं टीकास्त्रही पटोले यांनी सोडलं.

शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून शेती मित्रांच्या घशात घालायचे षडयंत्र आहे. ज्या भाजप सरकारला अन्नदात्याच्या भावना कळत नाहीत, अशा शेतकरी विरोधी आणि अत्याचारी सरकारला घरी पाठवा. काँग्रेस पक्ष तुम्हाला न्याय देईल, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com