बुलढाणा जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, हजारो अल्पवयीन मुलींची तस्करी,गोवंश तस्करी,जळगाव जामोद बनावट हत्याकांड प्रकरणात पोलिस आणि गृह विभागाची झालेली बदनामी या सर्व कारणांना बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे जबाबदार असून ते जिल्ह्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असल्याचा दावा करत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच शेकडो शिवसैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड घडवून पोलीस अधीक्षकांनी गृह विभाग व पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
याशिवाय राजुरा धरण परिसरात अज्ञात महिलेच्या मारेकऱ्यांना शोधण्यास बुलढाणा पोलीस अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षकांचे निलंबन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. उद्या दिनांक १ जुलैपासून आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड हे शिवसेना जिल्हाप्रमुख व शेकडो शिवसैनिकांसह बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या प्रकरणाची आता गृह विभाग काय दखल घेते आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे निलंबन होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.