मयुरेश कडव
बदलापूर : सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळच्या कासगावात उघडकीस आला आहे. याठिकाणी खासगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप होत आहे. संतापजनक म्हणजे या पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय यंत्रणेमार्फत गावात काही काम करावयाचे झाल्यास पाठपुरावा करावा लागत असतो. तरी देखील यंत्रणेद्वारे काम संथ गतीने केले जात असते. मुळात शासकीय निधीतून केले जाणारे काम हे सार्वजनिक वापरासाठी होत असते. काम पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांसाठी खुले असते. अर्थात एखाद्या नदी किंवा नाल्यावर बांधण्यात येणार पूल हा सार्वजनिक असतो. मात्र बदलापूरमध्ये जरा वेगळाच प्रकार समोर आला आहे.
शेती नाही कि वस्ती नाही
बदलापूर जवळच्या कासगावातील समर्थवाडीलगत एका ओढ्यावर लाखो रुपये खर्चून पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूला कुठचीही शेती किंवा लोकवस्ती नाही. एका बाजूला वनखात्याची जमीन तर दुसऱ्या बाजूला खाजगी मालकीची जागा आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये खर्च करून हा पूल नेमका कोणासाठी बांधण्यात आला आहे; असा सवाल मनसेचे स्थानिक पदाधिकारी राकेश टेंबे यांनी उपस्थित केला आहे.
खासगी जागेसाठी सरकारी पैसा
दरम्यान सदरच्या पुलावरून लोकांची तसेच वाहनांची ये- जा होताना दिसत नाही. शिवाय पुलाच्या एका बाजूला चक्क जाळी बसवण्यात आली आहे. हा पूल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र खाजगी जागेसाठी अशा प्रकारे सरकारी पैशातून पूल बांधता येतो का, हाच खरा प्रश्न निर्माण होत आहे. या ठिकाणी सरळ सरळ सरकारी पैशांचा अपव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी राकेश टेंबे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.