
अकोला शहरात पाणीपुरवठ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. सध्या आठवड्यातून फक्त दोनच दिवस पाणीपुरवठा होत असून, तेही अत्यंत गढूळ आणि दूषित स्वरूपात मिळत आहे. नागरिकांना हिरवट, पिवळसर आणि फेसाळलेलं पाणी मिळत असल्याने ते वापरण्यासही अयोग्य ठरत आहे.
अकोलेकरांसाठी नळ योजनेतून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहराला पाणी पुरविले जात असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून या पाण्याचा रंग पिवळसर आणि हिरवट दिसत आहे. विशेषतः, या पाण्यात जीवजंतू आणि किडे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिक हेच पाणी घरगुती उपाय करून पिण्यास वापरत आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. विशेषतः, मागील आठवड्यात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरले आणि नागरिकांना पुरवला जाणारा गढूळ पाणी त्यांना प्यायला देण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही अकोलेकरांना स्वच्छ पाणी मिळत नाही, आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न तसाच कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, प्रशासनावर टीका केली जात आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.