

भारतीय संस्कृतीत आयुर्वेदानानुसार, जेवणासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच एक ग्लास पाणी गिळण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतेय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमची ही सवय तुमच्या पचनावर परिणाम करते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊया.
पोटातील डायजेस्टिव्ह एंझाइम आणि गॅस्ट्रिक ज्यूस पाण्यामुळे पातळ होतात. ज्यामुळे अन्नाचं पचन मंदावू लागतं. यामुळे गॅस, आम्लता, पोटफुगी आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी वाढू शकते. ज्यावेळी अन्नाचं योग्यरित्या पचन होत नाही तेव्हा ते ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. अशावेळी चरबी म्हणून ते शरीरात साठवलं जातं. यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतोच परंतु ब्लड शुगरच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.
पचनक्रियेदरम्यान जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक आतड्यांमध्ये शोषले जातात. अशावेळी जर पचन योग्य नसेल तर शरीर अन्नातील पोषक घटक योग्यरित्या शोषून घेतले जात नाही. त्यामुळे अशक्तपणा येण्याचा धोका असतो.
जेवणाच्या ३० मिनिटं आधी आणि जेवणानंतर किमान ४० मिनिटं पाणी प्यावं.
जर जेवताना तुमचा घसा कोरडा किंवा तिखट वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी किंवा ताक एक किंवा दोन घोट पिऊ शकता.
पचन सुधारण्यासाठी आणि पोषक तत्वांचं योग्य पद्धतीने शोषण व्हावं म्हणून अन्न नीट चावून खाल्लं पाहिजे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.