

अलीकडच्या काही वर्षांत त्वचेशी संबंधित तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येतं. विशेषतः सेंसेटीव्ह स्किन ही समस्या आता केवळ काही लोकांपुरती मर्यादित न राहता लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांना याचा सामना करावा लागतोय. एकेकाळी दुर्मिळ मानली जाणारी ही समस्या आता सर्वसामान्य होत चाललीये.
वाढतं प्रदूषण, धावपळीचं जीवन, मानसिक ताणतणाव आणि स्किन केअर प्रोडक्ट्सचा अतिरेकी वापर या सर्व कारणांमुळे भारतीयांमध्ये सेंसेटीव्ह स्किनचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौफे सांगतात की, संवेदनशील त्वचा ही आता क्वचित आढळणारी समस्या राहिलेली नाही. त्वचेवर लालसरपणा येणं, खाज सुटणं, जळजळ होणं, कोरडेपणा जाणवणं तसंच अचानक ब्रेकआउट्स होणं अशा तक्रारी वाढताना दिसतायत. ज्यांना पूर्वी कधीच त्वचेच्या समस्या नव्हत्या अशा लोकांमध्येही ही लक्षणं दिसून येतात.
अनेकदा पूर्वी वापरत असलेले प्रोडक्ट्स अचानक त्वचेवर प्रतिकूल प्रतिक्रिया देऊ लागतात. काहींना सूर्यप्रकाशात थोडा वेळ जरी राहिलं तरी पुरळ किंवा जळजळ जाणवते. तर चेहरा धुतल्यानंतर त्वचा चुरचुरल्यासारखं वाटू लागतं. त्यामुळे त्वचेच्या काळजीकडे गांभीर्याने पाहण्याची आणि सेंसेटीव्ह समस्यांना योग्य प्रकारे हाताळण्याची गरज निर्माण झालीये, असंही डॉ. चौफे म्हणाल्यात.
वायू प्रदूषण हा सेसेटीव्हीटीमागचा एक महत्त्वाचा घटक आहे. हवेत असलेली धूळ, धूर आणि सूक्ष्म हानिकारक कण त्वचेच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवतात आणि तिची नैसर्गिक संरक्षक क्षमता कमी करतात. याशिवाय वाढता ताणतणाव, अपुरी किंवा अनियमित झोप, हार्मोन्समधील बदल, असंतुलित आहार, शरीरातील पाण्याची कमतरता, अतिनील किरणांचा परिणाम, एक्झिमा आणि रोसेसिया या सर्व गोष्टी त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडवतात.
अनेक स्किनकेअर प्रोडक्ट्स एकाच वेळी वापरणं किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय वारंवार एक्सफोलिएशन करणं यामुळे त्वचेच्या संरक्षणात्मक थराला हानी पोहोचते आणि त्वचा अधिक संवेदनशील होते. सुगंधयुक्त साबण, अल्कोहोलयुक्त टोनर किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय वारंवार कॉस्मेटिक उपचार केल्यासही त्वचेवरील ताण वाढतो.
त्वचेचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सौम्य आणि वैद्यकीयदृष्ट्या तपासलेले प्रोडक्टस वापरणं उपयुक्त ठरतं. योग्य स्किनकेअर अवलंबल्यास त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते, त्वचेचा बिघडलेला थर दुरुस्त होतो आणि कालांतराने त्वचेची सहनशक्ती सुधारते. कोणतेही रासायनिक उत्पादन स्वतःहून वापरण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे.
संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. सौम्य आणि सुगंधरहित क्लीन्झरचा वापर करावा. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी दररोज ५० पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरणं अत्यावश्यक आहे.
वारंवार प्रोडक्ट्स बदलणं, जोरात स्क्रब करणं किंवा त्वचेला अनावश्यक घासणं टाळावं. त्वचारोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच प्रोडक्ट्सची निवड करावी. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा इतर ताणनियंत्रण तंत्रांचा अवलंब करावा. पुरेशी झोप घेणं आणि शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.