

आजकालची धावपळीची जीवनशैली पाहिली तर अनेक लोकांच्या जेवणाच्या वेळा ठराविक नसतात. यामध्ये कामाचा ताण, बदलती जीवनशैली किंवा वेळेअभावी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवलं जातं. काही जण भूक लागल्यावरच खातात, तर काही जण जेवणाची वेळ वारंवार बदलतात. मात्र, डॉक्टरांच्या मते जेवणासाठी एक ठरलेली वेळ असणं गरजेचं आहे. दररोज वेगवेगळ्या वेळेला जेवण केल्यास त्याचा थेट परिणाम पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
आपल्या पोटात आणि आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे चांगले बॅक्टेरिया असतात. यालाच ‘गट मायक्रोबायोम’ असं म्हटलं जातं. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरातील अन्नाचं पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे या बॅक्टेरियांनाही स्वतःचं बायोलॉजीकल क्लॉक असतं. ज्यावेळी आपण रोज ठराविक वेळ न पाळता वेगवेगळ्या वेळेला जेवतो, तेव्हा या बॅक्टेरियांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. हळूहळू चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी होऊ लागते. अशावेळी हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे पचनशक्ती कमकुवत होण्याचा धोका वाढतो.
आपला मेंदू आणि पोट एकमेकांशी सतत संपर्कात असतात. ठराविक वेळेला जेवण करण्याची सवय असल्यास शरीर त्यानुसार पाचक रस आणि अॅसिड तयार करतं. पण जेवणाच्या वेळा सतत बदलत राहिल्यास शरीराचा हा समतोल बिघडतो.
अनेकदा शरीर नेहमीच्या वेळेनुसार पाचक रस तयार करतं पण त्या वेळी अन्न पोटात पोहोचत नाही. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि काही प्रकरणांमध्ये अल्सरचा धोकाही वाढू शकतो. तसंच सतत उशिरा जेवण्याची सवय असल्यास पोट फुगणं, गॅस होणं आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
जेवणाची वेळ नियमित नसल्यास शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर म्हणजेच मेटाबॉलिझमवरही त्याचा परिणाम होतो. शरीराला अन्न कधी पचवायचं आणि त्यातील पोषक घटक कधी शोषून घ्यायचे याचा योग्य ताळमेळ बसत नाही. परिणामी मेटाबॉलिझम मंदावू लागतं आणि अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे अनेकांना दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.
प्रत्येकाने शक्यतो रोज एकाच वेळेला नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करण्याची सवय लावावी. जेवणाच्या वेळा सतत बदलल्यास अपचन, पोट फुगणे, अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि दीर्घकालीन बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा वारंवार पचनाच्या तक्रारी होत असतील, तर त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होऊ शकतो. इतकंच नाही तर अशा समस्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि एकूण आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज जेवणाची निश्चित वेळ पाळणं ही महत्त्वाची सवय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.