

आपल्यापैकी अनेकजण चहा आणि कॉफी साखरेशिवाय पितात. असं केल्याने आपल्याला मधुमेह होणार नाही असा अनेकांचा समज असतो. एकंदरीत साखर बंद केली म्हणजे मधुमेह टळेल, असा एक समज समाजात मोठ्या प्रमाणात पसरलाय. मात्र मुंबईतील सैफी रूग्णालयातील एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. स्नेहला शेख यांनी या समजुतीबाबत गंभीर इशारा दिला आहे.
डॉक्टरांच्या मते, फक्त चहातील साखर टाळून डायबेटीस रोखता येत नाही. आज अनेक तरुण साखर न खाताही देखील मधुमेहाच्या विळख्यात अडकत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉ. शेख सांगतात की, साखर कमी करणं चांगलं आहे, पण रक्तातील साखरेवर परिणाम करणारे इतर अनेक घटक त्याहून अधिक धोकादायक आहेत. आपण दिवसभर किती हालचाल करतो, किती झोप घेतो, ताण किती असतो आणि नेमका कोणता आहार घेतो यावर शरीराची साखर नियंत्रणात राहते की नाही हे अवलंबून असतं.
आजकाल ऑफिसमधील कर्मचारी आठ-दहा तास एका खुर्चीत बसून काम करतात. यामुळे त्यांची शरीरिक हालचाल फारच कमी होते. एका संशोधनानुसार, दररोज बसून घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासामुळे डायबेटीसचा धोका २२ टक्क्यांनी वाढू शकतो. सतत बसून राहण्याचा संबंध केवळ मधुमेहाशीच नाही तर हृदयविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि काही गंभीर आजारांशीही जोडला गेला आहे.
डॉ. शेख यांच्या मते, बैठी जीवनशैली ही धूम्रपानाइतकीच धोकादायक ठरू शकते. शरीराची हालचाल कमी झाली की, स्नायू ग्लुकोज वापरणं कमी करतात. परिणामी शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होऊ लागतो आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं.
अपुरी झोपही देखील मधुमेह वाढण्यामागे एक मोठी समस्या दिसून आली. एका अभ्यासानुसार, जे तरूण अपुरी झोप घेत होते त्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून त्यांच्या glucose metabolism मध्ये मोठा बदल आला. यामुळे शरीर कमी इन्सुलिन तयार करू लागतं तर कोर्टिसोलसारखे ताण वाढवणारे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं कठीण होतं.
तणावाचाही मधुमेहावर मोठा परिणाम होत असल्याचं डॉक्टर शेख यांनी स्पष्ट केलंय. सततचा मानसिक ताणाव असल्यास शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवतो. त्यामुळे यकृत अधिक प्रमाणात ग्लुकोज रक्तात सोडतं. दीर्घकाळ असंच सुरू राहिल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स वाढून टाइप-२ डायबेटीसचा धोका दोन ते तीन पटींनी वाढू शकतो.
आजकाल बाजारात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर शुगर फ्री असा लेबल लावलेला दिसतो. मात्र हे पदार्थही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अशा पदार्थांमध्ये मैदा, प्रोसेस्ड तेल आणि विविध अॅडिटिव्ह्ज हे पदार्थ असतात. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये थेट साखर नसली तर तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते.
आहारामध्ये तुम्ही फायबरयुक्त आणि चांगल्या आहाराची निवड करणं योग्य आहे. सलाड, प्रोटीनयुक्त पदार्थ, संपूर्ण धान्यं आणि कमी प्रोसेस्ड फूड घेतल्यास शरीरातील ग्लुकोज हळूहळू वाढतं आणि इन्सुलिनला योग्य प्रकारे काम करण्यासाठी वेळ मिळतो.
डॉ. शेख सांगतात की, नियमित व्यायाम, दर तासाला थोडं चालणं किंवा उभं राहणं, सात ते आठ तासांची चांगली झोप, ताण कमी ठेवणं आणि संतुलित आहार घेणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त चहातील साखर बंद करून उपयोग नाही संपूर्ण जीवनशैली बदलणं हीच खरी गरज आहे.
टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.