

आजकाल मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय. मात्र, केवळ रक्तातील साखर वाढणं हीच त्याची अडचण नसून त्यातून अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. त्यापैकीच एक धोकादायक आजार म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी. या आजाराकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर रुग्णाच्या चालण्या-फिरण्यावरही परिणाम होऊ शकतो.
अनेक मधुमेही रुग्णांना या आजाराबद्दल पुरेश्या प्रमाणात माहिती नसते. त्यामुळे डायबिटिक न्यूरोपॅथी नेमकी काय आहे ती का होते आणि तिच्यापासून बचाव कसा करायचा, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
डायबिटिक न्यूरोपॅथी हा असा आजार आहे ज्यामध्ये दीर्घकाळ रक्तातील साखर वाढलेली राहते आणि शरीरातील नसांवर परिणाम होतो. आपल्या शरीरातील नसांचं काम म्हणजे मेंदूपर्यंत वेदना, उष्णता, थंडी किंवा स्पर्श यासारख्या संवेदना पोहोचवणं असतं. पण ज्यावेळी रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण जास्त काळ वाढलेलं राहतं.
या अवस्थेमध्ये विशेषतः पाय, हात, तळपाय किंवा पायांच्या बोटांमध्ये झिणझिण्या येणं, जळजळ होणं, मुंग्या येणं किंवा वेदना जाणवू शकतात. काही रुग्णांमध्ये ही समस्या इतकी वाढते की पचनसंस्था, हृदयाचे ठोके आणि इतर शारीरिक क्रियांवरही त्याचा परिणाम होऊ लागतो.
या आजारामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे दीर्घकाळ नियंत्रणात न राहिलेली रक्तातील साखर. शरीरातील नसांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी ऑक्सिजन आणि पोषणाची गरज असते. हे पोषण छोट्या रक्तवाहिन्यांमधून मिळतं. पण रक्तातील साखरेचं प्रमाण सतत जास्त राहिल्यास त्या खराब होतात आणि नसांना पुरेसा पुरवठा होत नाही.
याशिवाय काही इतर कारणांमुळेही डायबिटिक न्यूरोपॅथीचा धोका वाढतो. जास्त साखरेमुळे नसांमध्ये सूज निर्माण होते. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. यामुळे नसांमधून सिग्नल पाठवण्याची प्रक्रिया मंदावते. तसंच नसांभोवती असलेलं संरक्षणात्मक आवरणही कमकुवत होऊ लागते.
नसांचं नुकसान कसं होतं?
डायबिटीजमुळे नसांचं नुकसान अचानक होत नाही. ही प्रक्रिया हळूहळू वाढत जाते. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं सौम्य असल्याने अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.
ज्यावेळी शरीरातील रक्तवाहिन्या खराब होतात, तेव्हा नसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे नसांची ताकद कमी होऊ लागते.
या स्थितीत नसांचे तंतू आकुंचन पावू लागतात. त्यामुळे शरीरातील संदेश योग्य पद्धतीने पोहोचत नाहीत आणि संवेदनांमध्ये बदल जाणवू लागतो.
सुरुवातीला पायात किंवा हातात झिणझिण्या आणि जळजळ जाणवते. मात्र कालांतराने वेदना किंवा तापमान जाणवण्याची क्षमता कमी होऊ शकते. ही अवस्था धोकादायक मानली जाते.
प्रत्येक मधुमेही रुग्णाला डायबिटिक न्यूरोपॅथी होतेच असं नाही. मात्र मधुमेह जितका अगोदर झाला असेल तितका हा धोका वाढतो.
ज्या लोकांना ५ ते १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ डायबिटीज आहे, त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.
ज्यांचा HbA1c सतत जास्त असतो किंवा ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही, त्यांच्यात न्यूरोपॅथीचा धोका वाढतो.
जास्त वजन, कमी हालचाल किंवा नियमित व्यायाम न करणं हे देखील या समस्येला कारणीभूत ठरू शकतं.
उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार, वाढतं वय तसंच धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा धोका अधिक दिसून येतो.
हा आजार पूर्णपणे टाळणं नेहमी शक्य नसलं तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचा वेग कमी करता येतो किंवा धोका टाळता येऊ शकतो.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
नियमित आरोग्य तपासणी करा
संतुलित आहार घ्या
नियमित व्यायाम करा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.