

पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते. मात्र, या दिवसांत सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात हवेत ओलावा वाढतो. अनेक ठिकाणी पाणी साचतं. अशा वातावरणात जंतू आणि डास वाढण्याची शक्यता असते. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानेही आजार होऊ शकतात. त्यामुळे या काळात स्वच्छता आणि योग्य आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात खालील आरोग्याच्या समस्या अधिक दिसू शकतात.
सर्दी आणि खोकला
विषाणूजन्य ताप
पोटाचे आणि आतड्यांचे आजार
त्वचेची अॅलर्जी
डासांमुळे होणारे आजार
पावसाळ्यात शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन C हे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्व आहे. ते रोगप्रतिकारक शक्तीच्या योग्य कार्याला मदत करते. तसंच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोलेजनच्या निर्मितीलाही ते मदत करते.
ॲबॉट इंडियाचे असोसिएट डायरेक्टर मेडिकल अफेयर्स डॉ. अंकित राय सांगतात की, व्हिटॅमिन C शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीला मदत करते. तसंच ते शरीराला अँटिऑक्सिडंट संरक्षण देण्याचं काम करतं. त्यामुळे संतुलित आहारातून व्हिटॅमिन C घेणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
व्हिटॅमिन C मिळवण्यासाठी महागडे पदार्थ खाण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या आहारातील अनेक पदार्थांमध्ये ते मिळते.
आवळा
पेरू
संत्री
मोसंबी
टोमॅटो
ढोबळी मिरची
ताजी फळे आणि भाज्या आहारात घेतल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.
हात स्वच्छ धुवा- जेवण करण्यापूर्वी आणि बाहेरून घरी आल्यानंतर हात साबणाने धुवा.
स्वच्छ पाणी प्या- शक्यतो स्वच्छ किंवा उकळलेले पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
ताजे अन्न खा- ताजी फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थ खा.
व्यायाम आणि झोप- नियमित हलका व्यायाम करा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या.
त्वचा कोरडी ठेवा- पावसात भिजल्यानंतर कपडे बदलून शरीर आणि त्वचा व्यवस्थित कोरडी करा. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
पावसाळ्यात काही गोष्टी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
न धुतलेली फळं आणि भाज्या खाऊ नका
शिळं किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेलं अन्न खाऊ नका
तेलकट आणि तळलेले पदार्थ वारंवार खाऊ नका
घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका
बाहेरचं अस्वच्छ पाणी किंवा अन्न घेणे टाळा
मुंबईतील सुचक हॉस्पिटल आणि एशियन हार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार फिजिशियन, कार्डिओपल्मोनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. केतन मेहता यांच्या मते, पावसाळ्यात हवामानातील बदल आणि जंतूंच्या संपर्कामुळे सामान्य संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. ताजं अन्न खाणं, स्वच्छ पाणी पिणं, हात-पाय स्वच्छ ठेवणं आणि पौष्टिक आहार घेणं यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.