

आपल्या दररोजच्या जेवणात भात हा खूप महत्त्वाचा आहे. भात हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग मानला जातो. जगातील जवळपास तीन-चतुर्थांश लोकसंख्येच्या दैनंदिन जेवणाचा पाया भातावरच असल्याचं समोर आलं आहे. केवळ रोजच्या जेवणातच नाही, तर सणासुदीच्या दिवसात देखील घरात भात शिजतो.
एकंदरीत भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मात्र त्यानंतर एक असा प्रश्न समोर येतो की, इतक्या मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाणारा भात आरोग्यासाठी खरंच चांगला असतो का? अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, रात्री भात खाल्ल्याने वजन वाढतं किंवा ब्लड शुगरची पातळी वाढते.
याच कारणामुळे अनेकजणं रात्रीच्या जेवणात भात खाणं पूर्णपणे टाळतात. मात्र भात खाण्याच्या सवयीमागचं विज्ञान समजून घेतलं तर आहाराशी संबंधित अनेक गैरसमज दूर होऊ शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे संध्याकाळच्या वेळी खाल्लेले कार्बोहायड्रेट्स झोपेच्या क्वालिटीवर सकारात्मक परिणाम करू शकतात. काही संशोधनांनुसार, झोपण्यापूर्वी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहारात घेतल्याने शरीरात सेरोटोनिन वाढण्यास मदत होऊ लागते. चांगली झोप येण्यासाठी हे हार्मोन फार महत्त्वाचं असतं.
इतर काही अभ्यासांनुसार असंही समोर आलंय की, ज्यांची झोप चांगली होते ते लोक पुढच्या दिवशी त्यांची भूक आणि खाण्याच्या सवयी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतात. चांगली झोप मिळाल्यास जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांची इच्छा कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणंही सोपं होतं. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत भात खाल्ल्यास तो रात्रीच्या जेवणातही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
रात्रीच्या वेळेस भात खाल्ला तर वजन वाढतं ही समजूत चुकीची आहे. खरं तर समस्या भातामध्ये नसते. तर आपण भात किती प्रमाणात खाल्ला आहे हे महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश केल्याने वजन वाढेल असं नाही. भातासोबत डाळ, मासे, पनीर किंवा अंडी यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. त्यासोबत भरपूर भाज्या घेतल्यास फायबरचं प्रमाण वाढतं. परिणामी ज्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं.
मात्र खूप तेलकट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ भातासोबत घेतल्यास जेवणातील कॅलरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
भात पूर्णपणे रात्री टाळण्याची गरज नसली तरी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ दिवसाच्या सुरुवातीच्या वेळेत खाण्याचे काही शारीरिक फायदे असतात. आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम आणि insulin sensitivity या नैसर्गिक सर्केडियन रिदमनुसार काम करतात. दिवसाच्या वेळेत या प्रक्रिया अधिक एक्टिव्ह असते. तर रात्रीच्या वेळी त्या हळूहळू कमी होऊ लागतात.
भात पूर्णपणे आहारातून काढून टाकण्याऐवजी योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचे फायदे मिळू शकतात. यामुळे रक्तातील साखर तसंच वजन नियंत्रणात ठेवणंही सोपं होतं.
दुपारची वेळ भातावर आधारित जेवणासाठी सर्वात योग्य मानली जाते. या वेळी शरीराचं मेटाबॉलिझम अधिक एक्टिव्ह असतो. शक्य असल्यास ब्राऊन राईस, रेड राईस यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं.
जर रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश करत असाल तर प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भाताचं कमी प्रमाण आणि त्यासोबत फायबरयुक्त भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्यास ब्लड शुगरमध्ये होणारे बदल कमी होतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.