
दररोज आपण लहानमोठे निर्णय घेत असतो. काही निर्णय अगदी साधे वाटतात जसं की, काय खावं, काय विकत घ्यावं... पण काही वेळा हे निर्णय जीवनाला खोलवर स्पर्श करणारे असतात. कामाच्या ठिकाणी कसे वागायचं, नातेसंबंधांमध्ये कोणती भूमिका घ्यायची किंवा प्रामाणिकपणाची परीक्षा घेणाऱ्या क्षणी कसा प्रतिसाद द्यायचा, हे निर्णय आपली मूल्यं, आपली प्रामाणिकता आणि इतरांबद्दलचा सन्मान यांचे प्रतिबिंब असतात.
यामध्ये खरी कसोटी फक्त निर्णय घेण्यात नसते तर आपल्या अंतर्मनाशी सुसंगत, इतरांचा सन्मान राखणारा आणि आत्मिक शांतता देणारा निर्णय घेण्यात असते. भगवद्गीतेसारखा ज्ञानग्रंथ या क्षणांमध्ये मार्गदर्शन करणारा ठरतो.
योग्य निर्णय घेण्याच्या केंद्रस्थानी ‘धर्म’ ही संकल्पना आहे. धर्म म्हणजे केवळ काही कठोर नियम नव्हे तर तो म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आपली भूमिका ओळखून, सत्य आणि नीतीशी सुसंगत अशा मार्गाने वागणं होयं. धर्म आपल्याला न्याय, समन्वय आणि कल्याण साधणाऱ्या कृतीकडे घेऊन जातो.
व्यवहारात याचा अर्थ असा की, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारणं, ही कृती प्रामाणिक आहे का? यात कोणाचं नुकसान होणार नाही ना? अगदी रोजच्या छोट्या निर्णयांनाही आपण जागरूकतेने घेतले, तर तेही धर्माचं आचरण ठरतात.
भगवद्गीता कर्मयोगाचा उपदेश करते. म्हणजेच फळाशी आसक्ती न ठेवता नि:स्वार्थ भावनेने कृती करणं. बऱ्याच वेळा आपले निर्णय भीती, इच्छा किंवा अहंकार यांच्यामुळे प्रभावित होतात. यामुळे कधी आपल्याला फायदा होतो पण इतरांना हानी पोहोचतं तर कधी आपणच नंतर पश्चात्तापात गुरफटतो.
योग्य कृतीवर लक्ष केंद्रित केल्यास, परिणाम आपोआप योग्य दिशेने जातात. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी प्रामाणिक पण सन्मानपूर्वक फीडबॅक देणं, जरी ते थोडे अस्वस्थ करणारं असले तरीही. नात्यांमध्ये फसवणुकीपेक्षा सत्य निवडणं, जरी त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला तरीही.
भगगीतेत ‘बुद्धी’ म्हणजेच विवेकाला विशेष महत्त्व दिलं आहे. सुज्ञ निर्णय म्हणजे विचार, अनुभव आणि भावनिक सजगतेचा समन्वय. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबणं, त्या क्षणातील भावना बाजूला ठेवणं आणि शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. या प्रक्रियेत निर्णयाचे परिणाम स्वतःवर आणि इतरांवर काय होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
बाह्य मार्गदर्शनासोबतच अंतर्मनातील सूक्ष्म आवाजाकडेही लक्ष दिल्यास निर्णय अधिक परिपक्व होतात. या प्रक्रियेमुळे निर्णय घेणं ही प्रतिक्रिया न राहता एक विचारपूर्वक कृती बनू लागते. ज्यामुळे अनावश्यक चुका कमी होतात.
कितीही विचारपूर्वक निर्णय घेतले तरी प्रत्येक वेळेला परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणेच होतील असं नाही. गीतेत समत्वभावाचा, म्हणजेच यश-अपयश दोन्ही परिस्थितींना समान शांततेने स्वीकारण्याचा उपदेश दिला आहे. खरं शहाणपण म्हणजे करुणा आणि प्रामाणिकतेने सर्वोत्तम निर्णय घेणं आणि त्यानंतर परिणाम काहीही असले तरी त्यांना शांतपणे स्वीकारणं. यात चूक झाली तर ती मान्य करून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगलं वागणं याचाही समावेश होतो.
भगवद्गीता आपल्याला संघर्षविरहित जगाचं वचन देत नाही पण ती आपल्याला संघर्षांचा सामना शहाणपणाने, करुणेने आणि धैर्याने करण्याचा मार्ग देतं. धर्माशी सुसंगत कृती, नि:स्वार्थ वृत्ती, बुद्धीचा विचारपूर्वक वापर आणि सात्त्विकतेची जोपासना या चार आधारांवर आपण असे निर्णय घेऊ शकतो जे स्वतःचा आणि इतरांचा सन्मान राखतात.
जीवनातील आव्हानं टाळता येत नाहीत पण प्रत्येक निर्णय हा प्रामाणिकपणे जगण्याची, सकारात्मक प्रभाव सोडण्याची आणि अंतर्मनाने वाढण्याची संधी ठरू शकतो. अशा दृष्टीकोनातून घेतलेले निर्णय केवळ योग्य मार्ग दाखवत नाहीत तर आणि अर्थपूर्ण नातेसंबंधही निर्माण करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.