

मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या पोटदुखीचा त्रास अनेक महिलांना सहन करावा लागतो. काही महिलांना हा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो तर काहींना इतका तीव्र वेदना होतात की रोजची कामं करणंही कठीण होतं. अशा वेळी अनेक महिला वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पेन किलरचा आधार घेतात. मात्र, पाळीच्या काळात या औषधांचा वापर योग्य आहे की नाही याबाबत अनेक गैरसमज आहेत. यावरच डॉक्टरांनी माहिती दिलीये.
सोशल मीडियावर ‘डॉ. क्यूटेरस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. तान्या नरेंद्र यांच्या मते, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांचं मुख्य कारण म्हणजे गर्भाशयात होणारं आकुंचन. प्रत्येक महिन्यात गर्भधारणेची तयारी म्हणून गर्भाशयाच्या आतील भागात एक आवरण तयार होतं. जर गर्भधारणा झाली नाही, तर हे आवरण शरीरातून बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय आकुंचन पावतं. या प्रक्रियेला चालना देण्यासाठी शरीरात ‘प्रोस्टाग्लँडिन्स’ नावाचं रसायन तयार होतं. पाळी सुरू होण्यापूर्वी या रसायनाची पातळी वाढते. ज्या महिलांच्या शरीरात प्रोस्टाग्लँडिन्सचं प्रमाण अधिक असतं त्यांना वेदनाही अधिक तीव्र जाणवतात.
याशिवाय, गर्भाशय आकुंचन पावत असताना काही काळासाठी त्या भागातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो किंवा थांबतो. ऑक्सिजनच्या या कमतरतेमुळेही पोटात कळा आणि वेदना निर्माण होतात.
डॉ. तान्या यांनी सांगितलं की, पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पेन किलर घेणं पूर्णपणे सुरक्षित आहे. या औषधांमुळे कोणतेही गंभीर नुकसान होत नाही. पाळीच्या वेदनांसाठी प्रामुख्याने इबुप्रोफेन किंवा मेफेनॅमिक अॅसिड यांसारख्या औषधांचा वापर केला जातो.
ही औषधं शरीरातील प्रोस्टाग्लँडिन्सचं उत्पादन कमी करतात. त्यामुळे गर्भाशयाचं आकुंचन कमी होते आणि वेदनांमध्ये लवकर आराम मिळतो. तसेच, काही प्रमाणात जास्त रक्तस्राव होण्याची समस्याही कमी होण्यास मदत होते.
अनेकांच्या मनात असा समज असतो की पाळीदरम्यान पेन किलर घेतल्याने गर्भाशयावर परिणाम होतो किंवा भविष्यात आई होण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे सर्व गैरसमज आहेत.
पाळीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या औषधांचा गर्भाशयावर किंवा महिलांच्या प्रजननक्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. ही औषधं केवळ काही तासांसाठी वेदना निर्माण करणारे सिग्नल आणि सूज कमी करण्याचं काम करतात.
तज्ज्ञांच्या मते, पेन किलर सुरक्षित असल्या तरी त्या रिकाम्या पोटी घेऊ नयेत. तसंच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणातच औषधं घ्यावीत. जर वेदना इतक्या तीव्र असतील की औषध घेतल्यानंतरही आराम मिळत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.