

सध्याच्या धावपळीमुळे अनेकांना त्यांच्या तब्बेतीकडे खाण्यापिण्याकडे लक्ष देता येत नाहीये. त्यामुळे अनेकवेळा अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कमी वयातच अनेकांना वृद्धांना होणाऱ्या आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यातच मधुमेह (diabetes) ही समस्या अनेकांमध्ये वाढताना दिसते.
भारतासारख्या देशांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे ही समस्या जास्त प्रमाणात वाढताना दिसतेय. अनेकदा कुटुंबातील एखाद्या सदस्याला मधुमेह झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या जीवनशैलीवर होतो. औषधोपचार हे डायबेटीसवर महत्त्वाचे उपचार असले तरी, काही लहान-मोठे दैनंदिन बदल सुद्धा रक्तातल्या साखरेवर सकारात्मक परिणाम करू शकतात.
डायबेटीज असलेल्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कुटुंबाने मोठे किंवा कठीण बदल करण्याची गरज नसते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण या साध्या सवयी डायबेटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.
डायबेटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. व्यायाम करताना शरीरातील स्नायूंना उर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराची इन्सुलिनबद्दलची संवेदनशीलता वाढते.
आई-वडिलांना दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगा किंवा पोहणे यासारख्या हलक्या-फुलक्या शारीरिक क्रिया करण्यास प्रोत्साहित करा. बागकाम, घरकाम किंवा जेवणानंतर थोडे चालणे यासारख्या साध्या हालचाली देखील रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
डायबेटीजवर मात करण्यासाठी आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. डायबेटीज असलेल्या व्यक्तींच्या आहारावर कठोर निर्बंध घालण्यापेक्षा त्यांना संतुलित आहार घेण्यास प्रोत्साहन देणे जास्त उपयुक्त ठरते.
संतुलित आहारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. फायबरमुळे ग्लुकोज रक्तात हळूहळू शोषले जाते, त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तसेच रिफाइन्ड साखरेचे सेवन कमी करणे आणि नियमित वेळेवर जेवण घेणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे शरीराची इन्सुलिन प्रतिक्रिया व्यवस्थित राहते.
डायबेटीज नियंत्रणात ठेवताना पुरेशी आणि नियमित झोप हा अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा पण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अपुरी किंवा अनियमित झोपेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अधिक कठीण होते.
आई-वडिलांनी दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन वापरणे टाळणे आणि नियमित झोपेची वेळ पाळणे हे सवयी अंगीकारल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
दीर्घकाळ तणाव असल्यास शरीरात कॉर्टिसोलसारखे तणाव हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणे अधिक अवघड होते.
ध्यान, प्राणायाम, योगा, आवडीचे छंद जोपासणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. कुटुंबीयांचा भावनिक आधार देखील मधुमेह असलेल्या व्यक्तीला आरोग्यदायी सवयी पाळण्यासाठी प्रेरणा देतो.
मधुमेह व्यवस्थापनासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे. यात रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांची तपासणी समाविष्ट असते.
दर काही महिन्यांनी HbA1c चाचणी केल्यास दीर्घकालीन रक्तातील साखर नियंत्रण कसे आहे याची माहिती मिळते. या अहवालांच्या आधारे उपचार पद्धतीत आवश्यक बदल करता येतात. कुटुंबाचा सहभाग असल्यास ही प्रक्रिया अधिक सोपी आणि परिणामकारक ठरते.
मधुमेहासोबत जगणे म्हणजे परिपूर्ण असणे नव्हे, तर सातत्य राखणे होय. जेवणानंतर थोडे चालणे, संतुलित आहार घेणे, नियमित झोप घेणे आणि तणाव कमी ठेवणे अशा साध्या सवयींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.
कुटुंबासाठी मधुमेह असलेल्या व्यक्तीला साथ देणे म्हणजे फक्त औषधोपचारात मदत करणे नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीची संस्कृती निर्माण करणे होय. कालांतराने या छोट्या सवयींमुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते आणि त्यांना अधिक सक्रिय व निरोगी जीवन जगता येते. ही माहिती डॉ. अरविंद बडिगर, टेक्निकल डायरेक्टर, BDR Pharmaceutical यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.