

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गंमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘बापल्योक’...
मकरंद शशिमधु माने दिग्दर्शित ‘बापल्योक’ येत्या १ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतेच अभिनेते शशांक शेंडे यांनी एका कार्यक्रमामध्ये एक वडीलांवर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी सादर केलेल्या या कवितेची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
‘बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वडिल आणि मुलातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’ या चित्रपटातून साधला आहे. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामध्ये बाप म्हणजे काय हे सांगितलं आहे.
शशांक शेंडे यांची कविता....
“बाप म्हणजे काय?
बाप म्हणजे जगण्याचं माप आहे,
पाठीवरची थाप आहे,
कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे,
तो म्हणजे बाप आहे,
बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे,
संकटातून पार करणारी होडी आहे,
जो कधी तिखट वागला तरीही ती आयुष्यभराची गोडी आहे,
बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे,
जगणं आपोआप आहे,
आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे,
तो म्हणजे बाप आहे....”
शशांक शेडेंचा हा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शशांक यांची वडीलांवरील कविता ऐकूण नेटकऱ्यांनी देखी त्यांच्या कवितेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या त्यांच्या या कवितेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा आवाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.