

१५ तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये जेवणाची सुविधा
ट्रेनमध्ये पुन्हा गरम जेवण मिळणार
ट्रेनमध्ये १५० ते २०० प्रवासी जेवण मागवतात.
तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील पॅन्ट्री कारमध्ये स्वयंपाकाची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. १५ तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी आता पॅन्ट्री कारमध्ये ताजे अन्न तयार केले जाणार आहे.
पश्चिम-आशियातील युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली होती. एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नसल्यानं एजन्सीसमोर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. देशात गॅसची टंचाई निर्माण झाल्यानंतर सरकारनं अनेक ठिकाणच्या गॅस वापरावर निर्बंध लादले होते. मात्र आता देशात गॅसचा पुरवठा सुरळीत चालू झाल्यानं भारतीय रेल्वेनं पॅट्री चालू करण्याचा निर्णय घेतलाय. गॅस टंचाई दरम्यान पॅन्ट्री कारमधील अन्न फक्त इलेक्ट्रिक इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन वापरून गरम केले जात होते.
किंवा आधीच शिजवलेले अन्न पुन्हा गरम करून प्रवाशांना दिले जात असे. हे अन्न बाहेरील क्लस्टर किचनमधून मागवले जात असे. पण आता रेल्वेने या व्यवस्थेत बदल करत ट्रेनमध्ये स्वयंपाक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था विशेष परिस्थितीत लागू करण्यात आली आहे. सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) सर्व ऑन-बोर्ड केटरिंग परवानाधारकांना सूचना जारी केल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, प्रवाशांना अधिक ताजे आणि उत्तम दर्जाचे अन्न पुरवणे हा या नवीन प्रणालीचा उद्देश आहे. लांबच्या प्रवासादरम्यान जेवणाच्या दर्जाबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. यामुळे जर पॅन्ट्री कारमध्ये स्वयंपाक केल्याने या तक्रारी मिटतील, अशी अपेक्षा आहे. सध्या नवीन प्रणालीनुसार, पॅन्ट्री कारमध्ये चहा, कॉफी, नाश्ता आणि राजमा-भात यांसारखे साधे जेवण तयार केले जात आहे.
दरम्यान एलपीजी गॅसच्या समस्येमुळे क्लाउड किचनवरही काही दिवस परिणाम झाला होता. काही दिवसांपासून क्लाउड किचनची सेवा बंद ठेवण्यात आली होती. एका ट्रेनमध्ये सुमारे १५० ते २०० प्रवासी जेवण मागवतात. मात्र गॅसची कमतरता आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे रेल्वेला हे नवीन पाऊल उचलावे लागले आहे.
जेवण देण्याची ही सुविधा मुंबईहून सुटणाऱ्या आणि चेन्नई, हावडा, बंगळूरु व दिल्लीला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांमधील प्रवाशांना आता प्रवासादरम्यान ताजे शिजवलेले जेवण दिले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा कंटाळा येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.