Action against fake beneficiaries in Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. या सर्व वादावर आणि संभ्रमावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली नाही
लाडकी बहीण योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान जवळपास ८० लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. या महिलांना आधी मिळालेल्या हप्त्यांची रक्कम सरकार परत वसूल करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. पात्र नसलेल्या किंवा आता अपात्र ठरलेल्या कोणत्याही लाडक्या बहिणीकडून सरकारने दिलेले पैसे परत वसूल केले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
१४ हजार पुरुषांवर गाजणार वसुलीचा बडगा!
महिलांकडून वसुली केली जाणार नसली, तरी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर मात्र सरकार कठोर कारवाई करणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल १४ हजार पुरुषांनी बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या सर्व १४ हजार पुरुषांकडून योजनेचे पैसे पूर्णपणे वसूल केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे.
महिलांसाठी पुन्हा सुरू होणार 'केवायसी विंडो' (KYC Window)
ज्या महिलांचे अर्ज किरकोळ त्रुटींमुळे किंवा आवश्यक कागदपत्रांभावी अपात्र ठरले आहेत, त्यांना निराश होण्याची गरज नाही. आपल्याकडे योग्य कागदपत्रे आहेत असं ज्या महिलांना वाटतं, त्यांच्यासाठी सरकार भविष्यात पुन्हा एकदा 'केवायसी (KYC) विंडो' खुली करणार आहे. यामुळे त्रुटी सुधारून पात्र महिलांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे.